
संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेर शहरात दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दिव्यांग भवनाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची व त्यासाठी नगरपालिकेने नेहरू गार्डनजवळ दिव्यांग भवनासाठी जागा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
गणेशनगर येथील नगरपालिका योग भवनात आयोजित एका कार्यक्रमात आमदार खताळ यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात-पाय, कॅलिपर्स आणि दिव्यांग प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, डॉ. संदीप कचोरिया, शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, आरपीआयचे शहर प्रमुख कैलास कासार, जालिंदर लहामगे यांच्यासह महायुतीचे अनेक मान्यवर उपस्थित होते.

आमदार खताळ यांनी आपल्या राजकीय प्रवासात संजय गांधी निराधार योजनेतून दिव्यांग बांधवांच्या गरजांची ओळख झाल्याचे सांगितले. तसेच, केंद्र सरकारच्या माध्यमातून माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ‘वयोश्री’ योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवल्याचे नमूद केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य अधिक गतिमानतेने सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शासनाच्या योजना पारदर्शकपणे राबवल्या जात असून, कोणत्याही कामासाठी पैसे न देण्याचे आवाहन त्यांनी केले. आपले आणि पालकमंत्री विखे पाटील यांचे कार्यालय, तसेच ‘विळद फाउंडेशन’ नेहमीच दिव्यांग बांधवांसाठी खुले राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन आणि दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत शिबिरात १२७ दिव्यांग बांधवांनी नोंद केली होती. त्यापैकी ८२ जणांना कॅलिपर्स मंजूर झाले होते, ज्यातून ७२ जणांना कॅलिपर्स आणि ४१ दिव्यांग बंधू-भगिनींना प्रमाणपत्राचे वाटप आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार खताळ यांनी दिव्यांग बांधवांना विश्वास दिला की, अडचणीच्या वेळी आपला भाऊ आणि मुलगा म्हणून ते २४ तास पाठीशी उभे राहतील.


