

संगमनेर, प्रतिनिधी:
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला राजकीय गोंधळ, वाढती गुंडगिरी आणि विधानसभेतील राड्याच्या घटनांवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. राज्यातील दहशतवाद आणि गुंडगिरी भाजप पुरस्कृत असल्याचा घणाघाती आरोप करत, विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.
महायुतीचे सरकार सत्तेवर कसे आले, त्यांनी कोणते ‘फंडे’ वापरले, पक्ष कसे फोडले आणि कसे चुकीचे निकाल दिले, हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच माहीत असल्याचं थोरात यांनी नमूद केलं. ते म्हणाले, आज महाराष्ट्रात गुंडांना आणि वाचाळवीरांना सरकारकडून एक प्रकारे मुभा दिली जात आहे. यामुळे राज्यात दहशत आणि गुंडगिरी वाढली असून, ही सर्व भाजप पुरस्कृत आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणवणाऱ्या भाजपसाठी हे अत्यंत लाजिरवाणं आहे.
राज्यात घडणाऱ्या घटनांवर चिंता व्यक्त करताना थोरात म्हणाले, महाराष्ट्रामध्ये सध्या जे घडत आहे, ते अत्यंत दुर्दैवी आहे. बीडमधील एका निरपराध सरपंचाला ज्या पद्धतीने मारण्यात आले, ते माणुसकीला लाजवेल असे आहे. एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो, तर दुसरा आमदार कॅन्टीनमधील वेटरला मारहाण करतो. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना ज्या गुंडांनी मारहाण केली, ते भाजपचेच पदाधिकारी आहेत. एखाद्या समाजाला विरोध करणे किंवा वडीलधाऱ्यांना काहीही बोलणे यासाठी भाजपने काही गुंड आणि वाचाळवीरांना मुभा दिली असून, हा राज्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं थोरात यांनी म्हटलं.
मी चाळीस वर्षे विधानसभा सदस्य म्हणून काम केले आहे. अशी संस्कृती कधीही नव्हती. पूर्वी वादविवाद होत असले तरी त्यानंतर आम्ही चहापानासाठी एकत्र येत होतो. मात्र, सध्या गुंड विधानसभेत येत आहेत, मारहाण करतात आणि त्यांना संरक्षण दिले जाते. मारहाण करणाऱ्याला संरक्षण आणि मार खाणाऱ्याला शिक्षा, हा कोणता प्रकार आहे? हे जनतेने वेळीच ओळखले पाहिजे, असे थोरात यांनी ठणकावून सांगितले.
प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याबाबत बोलताना थोरात म्हणाले, प्रवीण गायकवाड हे छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर आणि संत परंपरांचे समतेचे व बहुजनांचे विचार सांगत आहेत. हा विचार काही कडवट लोकांना सहन झाला नाही आणि त्यातून त्यांच्यावर हल्ला झाला. हा ‘काटे’ कोण आहे? तो गुंड आहे आणि भाजपचा पदाधिकारी आहे. त्याला पद दिले जात आहे. या काट्यामागचे खरे सूत्रधार शोधले पाहिजेत. असे ‘काटे’ जनतेने मोडून काढले पाहिजेत. अशा प्रसंगी जनतेने अधिक संवेदनशील होऊन जागृत झाले पाहिजे आणि सरकार विरोधात आवाज उठवला पाहिजे. आम्ही तर लढणारच आहोत, पण जनतेनेही याबाबत आवाज उठवणे गरजेचे आहे.
महायुती सरकारने अनेक खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवल्याचा आरोपही थोरात यांनी केला. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आमिष दाखवले, मात्र 1500 रुपयेही वेळेवर दिले जात नाहीत. अनेक लाडक्या बहिणींची नावे दररोज कमी केली जात आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, शेतकरी अडचणीत आहेत. खरे तर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही सरकारची जबाबदारी आहे, मात्र आता सरकार याबाबत बोलत नाही. शेतकऱ्यांनी याबाबत जागरूक होऊन सरकारला जाब विचारला पाहिजे, असेही ते म्हणाले.
निळवंडे कालव्याबाबत बोलताना माजी मंत्री थोरात यांनी सांगितले की, हे धरण आणि कालवे आपण दुष्काळी जनतेसाठी निर्माण केले आहेत. यावर्षी जूनमध्ये चांगला पाऊस झाला आहे. ओहरफ्लोचे पाणी पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळावे यासाठी आपण शासनाला पत्र दिले आहे. आता उर्वरित वितरिकांची कामे लवकर व्हावीत आणि या पाण्यापासून उपेक्षित असलेल्या शेतकऱ्यांना पाणी मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


राज्यात घडणाऱ्या घटनांवर चिंता व्यक्त करताना थोरात म्हणाले,
प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याबाबत बोलताना थोरात म्हणाले,
