
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त
राहुरी:
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण असून, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली.
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन शेतकरी भवन व उपहारगृहाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार काशीनाथ दाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्या नफ्यात व काटकसरीने चालवण्यावर भर दिला. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे उत्पादन वाढवण्याचे, फळबाग लागवडीचे आणि शाश्वत शेती पद्धतीचे अवलंबन करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. नवीन पिढीने पर्यावरणपूरक व कचरामुक्त शहर उभारणीत पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा उल्लेख करताना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी २० लाख घरे मंजूर झाली असून, त्यांच्या बांधकामासाठी ५ ब्रास वाळू मोफत दिली जात आहे. ‘लाडकी बहीण योजने’साठी ४५ हजार कोटींची तरतूद असून, अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील भगिनींनाच याचा लाभ मिळेल. नोकरदार कुटुंबांतील सदस्यांनी या योजनेचा लाभ न घेण्याचे आवाहन केले.
राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी २० हजार कोटी रुपये, तर शून्य टक्के व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. शेतकरी कल्याणासाठी दरवर्षी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद करून पाच वर्षांत २५ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. दिव्यांग लाभार्थ्यांचे संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत मासिक मानधन दीड हजार रुपयांवरून अडीच हजार रुपये करण्यात आले आहे. कांद्याच्या खरेदीसाठी नाफेडमार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून, शासनाला राज्याच्या उत्पन्नाच्या मर्यादेत कर्ज घेण्याची मुभा आहे. देशाच्या एकूण जीएसटीपैकी महाराष्ट्राचा वाटा १६ टक्के असून, त्यातील ८ टक्के वाटा राज्याला मिळतो.

पुणे – अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्गास केंद्र शासनाने मंजुरी दिली असून, भूसंपादन करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल, असेही पवार यांनी नमूद केले. यामुळे शेतमालाची वाहतूक सुलभ होणार आहे. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा कार्यान्वित झाली असून, सुसज्ज टर्मिनललाही मंजुरी मिळाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील भाविक शिर्डीला भेट देऊ शकतील, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाचे कौतुक करताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ही बाजार समिती राज्यातील पहिल्या दहा उत्कृष्ट बाजार समित्यांमध्ये समाविष्ट आहे.

