

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त
मुंबई, विशेष प्रतिनिधी:
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. या योजनेचा लाभ सरकारी सेवानिवृत्त महिलांसह हजारो पुरुषांनी घेतल्याचं उघड झालं आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली करण्याचे आदेश दिले आहेत.
या योजनेत सुमारे ४ हजार ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे. यावरून विरोधक सरकारवर चांगलेच आक्रमक झाले आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेवर सविस्तर चर्चा झाली. ज्या पुरुषांनी योजनेचा चुकीचा फायदा घेतला आहे, त्यांची चौकशी करून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
२६ लाखांपेक्षा जास्त अपात्र लाभार्थी- माहिती तंत्रज्ञान विभागाकडून या योजनेतील लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे. यामध्ये तब्बल २६ लाख ३४ हजार लाभार्थी अपात्र असूनही त्यांना योजनेचा लाभ मिळाल्याचं समोर आलं आहे. या सर्व अपात्र लाभार्थ्यांचा लाभ आता थांबवण्यात आला आहे.
या अपात्र लाभार्थ्यांमध्ये काही पुरुषांचाही समावेश आहे. या पुरुष लाभार्थ्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या घरात विकलांग किंवा इतर कारणांमुळे महिलेच्या नावावर खाते नसल्यास आणि महिलेचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले असल्यास, त्याचीही पडताळणी केली जाईल. ज्या प्रकरणांमध्ये पुरुष दोषी आढळतील, त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाईल.
महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि शासनाची दिशाभूल करून घेतलेली रक्कम वसूल करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.





राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेवर