

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
राजापूर: सोमवारी झालेल्या संगमनेर तालुक्यातील राजापूर गावच्या ग्रामसभेत महायुतीच्या एका पदाधिकाऱ्याकडून होत असलेल्या दडपशाहीची तक्रार समोर आली आहे. सरपंच कुसुमताई पानसरे यांनी, संदेश बाळासाहेब देशमुख हे गावातील विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप केला. या गंभीर आरोपांची दखल घेत, ग्रामपंचायत चुकीचे काम करत असेल तर वरिष्ठांकडे तक्रार करून चौकशीची मागणी करावी. विकास कामात अडथळे आणू नये, असा निर्णय घेण्यात आला.

सरपंच पानसरे यांनी ग्रामसभेत सांगितले की, संदेश देशमुख हे नेहमीच गावाच्या प्रगतीपथावरील कामांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. केवळ प्रसिद्धीसाठी ते विकासकामांना विरोध करतात. तालुक्याच्या नेतृत्वाने विकासाचा अजेंडा राबवण्याचे निर्देश दिले असतानाही, देशमुख त्यांच्या भूमिकेच्या विरोधात काम करत आहेत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायतीच्यावतीने ई-निविदा प्रक्रिया सुरू असताना, त्या उघडू नयेत यासाठी संदेश देशमुख बेकायदेशीर दबाव आणत असल्याची व त्यामुळे विकास कामांवर परिणाम होत असल्याची कैफियत सरपंच कुसुमताई पानसरे यांनी सोमवारच्या ग्रामसभेत मांडली. विकास कामांमध्ये अशा प्रकारे अडथळे आणले जात असून जर असे प्रकार सुरूच राहिले आणि त्यामुळे विकासकामांवर विपरीत परिणाम होत असेल, तर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

या मागणीला एकमुखी संमती मिळाल्यानंतर, ग्रामपंचायतीने आता पुढील पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे, गावाच्या विकासात अडथळे आणणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल, असा संदेश देण्यात आला आहे. या ग्रामसभेत अन्य महत्त्वपूर्ण विषयावर देखील चर्चा करण्यात आली.

