

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
पुणे: कुणीही उठतो आणि उपदेश करतो, सगळा मक्ता मीच घेतला आहे. कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असे वाटायला लागले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
पिंपरी-चिंचवडमध्ये मुळा नदीच्या सुशोभीकरण प्रकल्पासाठी झाडे तोडण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून ते चिडले. पर्यावरणप्रेमींनी पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी ही वृक्षतोड थांबवावी अशी मागणी केली होती, त्यावर त्यांनी हे विधान केले.
चिंचवडमध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी भाषणाच्या शेवटी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित केला. भापकर यांनी पवना, इंद्रायणी, मुळा नद्यांच्या सुशोभीकरण प्रकल्पांत हजारो झाडे तोडण्यात येत असल्याकडे लक्ष वेधले आणि पालकमंत्री म्हणून ही वृक्षतोड थांबवण्याची विनंती केली.
यावर अजित पवार म्हणाले की, हे सगळं ऐकल्यावर कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असे वाटायला लागले आहे. जो तो उठतो आणि मला उपदेश करतो. सगळा मक्ता मीच घेतला आहे. यांनी केवळ उपदेश करायचा.
मात्र, त्यांनी वृक्षतोडीच्या मुद्द्यावर थेट भाष्य करणे टाळले. त्याऐवजी, मराठवाडा आणि विदर्भात वृक्षलागवड कमी असल्यामुळे राज्य सरकारने वृक्षलागवडीची मोहीम हाती घेतल्याचे सांगितले. यंदा राज्यात 10 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून, पुढील चार वर्षांत एकूण 100 कोटी झाडे लावण्यात येतील, असे ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आदी उपस्थित होते.



यावर अजित पवार म्हणाले की, हे सगळं ऐकल्यावर कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असे वाटायला लागले आहे. जो तो उठतो आणि मला उपदेश करतो. सगळा मक्ता मीच घेतला आहे. यांनी केवळ उपदेश करायचा.
