

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
पुणे: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत महाराष्ट्रातील महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या राज्य महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे रूपवते यांनी म्हटले आहे.
ज्या तत्परतेने पुणे रेव्ह पार्टी आणि प्रांजल खेवलकर यांच्या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षांनी ठोस भूमिका घेतली, त्याच तत्परतेने कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा आरोप करणाऱ्या पीडित दलित मुलीला न्याय मिळवण्यासाठी दोन मिनिटांचा वेळ दिला नाही. आयोगाच्या अध्यक्षा पुण्यामध्येच वास्तव्यास असताना, पीडित मुली तीन दिवस सातत्याने पोलीस स्टेशनबाहेर आंदोलनात बसल्या होत्या, तरीही त्यांना भेटायला अध्यक्ष गेल्या नाहीत, असे आयोगाच्या माजी सदस्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी म्हटले आहे.
या उलट, तक्रारदार मुलीचे नाव सर्व समाज माध्यमांवर जाहीर करण्याची घोडचूक आयोगाने केली. याबद्दल त्यांना सतर्क केल्यानंतरही त्यात कोणताही बदल झालेला नाही. यामुळे पीडित मुलीच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
प्रत्येक गोष्टीत राजकारणाचा वास येणे ही स्वायत्त संस्था असलेल्या राज्य महिला आयोगाची हेळसांड असून, ती एक शोकांतिका आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. महिलांच्या प्रश्नांवर राजकारण न करता, संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
याप्रकरणी आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, वंचित बहुजन आघाडीकडून याप्रकरणी पुढील पाऊल काय उचलले जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.



प्रत्येक गोष्टीत राजकारणाचा वास येणे ही स्वायत्त संस्था असलेल्या राज्य महिला आयोगाची हेळसांड असून,
