महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर, प्रतिनिधी: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संगमनेर दौऱ्यामुळे येथील राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, या दौऱ्याची खरी उत्सुकता केवळ राजकीय भाषणांपुरती मर्यादित नसून, एका स्थानिक नागरिकाने सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या पत्राने ती आणखी वाढवली आहे. या पत्रात, सामान्य नागरिकाने एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट संगमनेरच्या विकासासाठी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यामुळे, आता उपमुख्यमंत्री या मागण्यांवर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा दौरा राजकीय सभांपेक्षा स्थानिक जनतेच्या अपेक्षांशी अधिक जोडला गेला आहे, असे दिसते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेले असे आहे सामान्य नागरिकाचे पत्र …
माननीय उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब आपले सहकार पंढरी संगमनेर नगरीत सहर्ष स्वागत.
आपण आपल्या दौऱ्यामध्ये संगमनेरच्या खालील उल्लेख केलेल्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढून संगमनेरकरांना दिलासा द्याल ही अपेक्षा.
- पुणे-नाशिक हायवेचे पूर्वीच्या मार्गानेच केलेले सर्वेक्षण कायम ठेवून त्वरित सेमीस्पीड रेल्वे मार्गाला गती द्यावी.
- कोल्हार-घोटी हायवेच्या काँक्रिटिकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी उपलब्ध करून द्यावा.
- 15 दिवसापूर्वी संगमनेर तालुक्यातील रद्द केलेल्या 40 कोटीच्या कामांच्या आदेशाला स्थगिती देऊन ती कामे पुन्हा कार्यन्वित करण्यात यावी.
- दुर्लक्षित व दुष्काळी भागाला कायमस्वरूपी पाणी पोहचण्यासाठी प्रवरा नदीपात्रात प्रोफाइल वालला मान्यता द्यावी.
- संगमनेरच्या वादातीत STP प्लांटचे भूमिपूजन आपण करावे.
- तरुणांच्या हाताला काम व घामाला दाम मिळण्यासाठी पठार भागातील MIDC प्रकल्पासाठी भरघोस तरतूद करण्यात यावी.
- पठार भागातील मोरदरा धरणाच्या आकृतिबंधाला गती देण्यात यावी.
- अहिल्यानगर जिल्ह्यात स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत एकही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही, आपण तो दुष्काळ संपवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची संगमनेरसाठी घोषणा करावी.
- संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील प्रस्तावित अपर तहसील कार्यालय तात्काळ रद्द करण्यात यावे.
- संगमनेर तालुक्यातील शहागड तसेच महा वटवृक्ष यांना जागतिक वारसा(World Heritage) म्हणून दर्जा देण्यासाठी आवश्यक प्रयत्नांची ग्वाही देण्यात यावी.
- संगमनेर शहरातील अनधिकृत बांधकामे तसेच शास्तीकर माफी संदर्भात संभ्रम दूर करावा.
- 2027 साली नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त नाशिक बरोबरच संगमनेरला सुद्धा एक ऐतिहासिक महत्व आहे. हे ओळखून आपण कुंभ मेळ्यानिमित्त येणाऱ्या साधू महंतासाठी पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेची घोषणा करावी.
- तसेच संगमनेर शहर व तालुक्यात शासनाच्या विविध विभागामध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार यांच्यासोबत मुंबई येथे बैठक लावण्याचे आश्वासन देण्यात यावे.
- शेवटचे अन सर्वात महत्वाचे गुंडागर्दी, दादागिरी, कट कारस्थान करून संगमनेरची शांतता भंग करून तालुक्याच्या विकासाला नख लावन्याचे काम काही राजकारणी करत आहेत त्यांचा बंदोबस्त आपण कराल ही अपेक्षा.
-एक संगमनेरकर.







आपण आपल्या दौऱ्यामध्ये संगमनेरच्या खालील उल्लेख केलेल्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढून संगमनेरकरांना दिलासा द्याल ही अपेक्षा.