संगमनेर-
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी त्यांची मागणी आहे. आरक्षणाचा जाहीर केलेला अध्यादेश (जीआर) संभ्रम निर्माण करत असून, केवळ ‘गॅझेट’च्या आधारावर आरक्षण देणे शक्य नाही, असे थोरात यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, पण ते ओबीसींच्या कोट्याला धक्का न लावता स्वतंत्रपणे देण्यात यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
जरांगे पाटलांच्या निर्णयाचे कौतुक- जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलन थांबवण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत परिपक्व आणि महत्त्वाचा असल्याचे थोरात म्हणाले. आंदोलन चिघळले असते, तर त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला भोगावे लागले असते. पाटील यांनी महाराष्ट्राची, मुंबईची आणि सामान्य जनतेची काळजी घेऊन हे आंदोलन थांबवले, ही त्यांची दूरदृष्टी असल्याचे सांगत थोरात यांनी त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले.
छगन भुजबळ आणि भाजपवर टीका- थोरात यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा उल्लेख करत ते पुरोगामी विचारांचे व्यक्तिमत्त्व असले तरी सध्या सरकारमध्ये असह्य मानसिकतेने काम करत आहेत, असे म्हटले. भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले, भाजपचे एकमेव ध्येय सत्ता मिळवणे हेच आहे आणि त्यासाठी ते कोणत्याही थराला जायला मागेपुढे पाहत नाहीत. पक्ष फोडणे, निवडणूक आयोगावर ताबा मिळवणे, धर्माचा राजकारणासाठी वापर करणे आणि समाजात फूट पाडणे हे लोकशाहीसाठी योग्य नाही.
सरकारचे अपयश- सरकारच्या कामकाजावर टीका करताना थोरात यांनी राज्यातील रस्त्यांच्या कामांचे ठेकेदार आत्महत्या करत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, संजय निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेसारख्या महत्त्वाच्या योजनांचा निधी लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नसल्याने हे सरकारचे अपयश असल्याचे त्यांनी सांगितले.
वारकरी संप्रदायाचा अवमान- थोरात यांनी भाजपवर वारकरी संप्रदायाचा अवमान केल्याचा आरोप केला. वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेत सर्व धर्म आणि सर्व पक्षांचे लोक सहभागी होत असतात, मात्र भाजपने ‘बोलघेवडे महाराज’ तयार करून या परंपरेचा मान राखला नाही, अशी टीका त्यांनी केली.
माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान: ‘गॅझेट’वर आरक्षण…
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, पण ते ओबीसींच्या कोट्याला धक्का न लावता स्वतंत्रपणे देण्यात यावे



संगमनेर- 
सरकारचे अपयश-
