छत्रपती संभाजीनगर: काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शनिवारी सकाळी पाहणी करून राज्य सरकारला ‘बाकी सारे सोडा, पहिले शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा’ असे कळकळीचे आवाहन केले आहे. त्यांनी तात्काळ आणि विनाअट मदत देण्याची मागणीही केली.
बांधावर जाऊन जाणून घेतल्या व्यथा- बिहारमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या बैठकीसाठी उपस्थित राहिल्यानंतर, थोरात यांनी तातडीने मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाकडे धाव घेतली. त्यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ढोरकिन आणि टाकळी फाटा येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
या पाहणी दौऱ्यात त्यांच्या समवेत खासदार कल्याण काळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, इसुफ शेख, रवींद्र काळे, विनोद तांबे, भाऊसाहेब जगताप, अशोक डोळस, रावसाहेब नाडे, संभाजी काटे, रवींद्र आमले आदी पदाधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘नुसती शेती नाही, तर महाराष्ट्र खचलाय’- गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. घरे आणि संसारोपयोगी सामानाची वाताहत झाली असून अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. मात्र, शासनाकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नसल्याबद्दल थोरात यांनी चिंता व्यक्त केली.
थोरात म्हणाले, झालेल्या अतिवृष्टीने नुसती शेती खचलेली नाही, तर महाराष्ट्र खचला आहे. शेतकऱ्यांसमोर मोठे भयानक संकट उभे आहे. अनेक ठिकाणी पूर्ण पिके पाण्याखाली गेली, तर काही ठिकाणी जमिनीही वाहून गेल्या आहेत. अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत.
तातडीने मदत द्या आणि सरसकट कर्जमाफी करा- शासनाने आता कुठलेही कागदी घोडे न नाचवता, सर्व नियम व अटी टाळून तातडीने मदत केली पाहिजे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही सरकारची पहिली भूमिका असली पाहिजे, मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. अनेक जाचक अटी टाकल्या जात आहेत.
यावेळी त्यांनी सरकारकडे पंचनाम्यांना गती देण्याबरोबरच, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशी जोरदार मागणी केली.
खासदार कल्याण काळे यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. सत्ताधारी येऊन केवळ फोटोसेशन करत आहेत, मात्र कुठलीही ठोस मदत जाहीर करत नाहीत. अत्यंत दुर्दैवी आहे. या सरकारला फक्त राजकारण करायचे असून शेतकऱ्यांशी काही देणे-घेणे नाही, असे ते म्हणाले.
आपला लोकनेता संकटकाळात बांधावर आल्याचे पाहून अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले. थोरात यांनी यावेळी ‘खंबीर राहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत’ असे सांगत सर्व शेतकरी व नागरिकांना धीर दिला.




छत्रपती संभाजीनगर: काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शनिवारी सकाळी पाहणी करून राज्य सरकारला
या पाहणी दौऱ्यात त्यांच्या समवेत
तातडीने मदत द्या आणि सरसकट कर्जमाफी करा-