

संगमनेर, प्रतिनिधी –
नाशिक-पुणे रेल्वे मार्ग संगमनेर तालुक्यातूनच झाला पाहिजे, या मागणीसाठी आपण लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह सातत्याने पाठपुरावा करत असून, रेडिओ दुर्बिणीचे कारण न देता हा मार्ग संगमनेरवरूनच नेण्याचा आपला आग्रह कायम आहे, असे ठाम प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले आहे.
नाशिक-पुणे रेल्वे मार्गाबाबत संगमनेर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, अशोक सातपुते, मेजर महेंद्र सोनवणे, संदीप सातपुते आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार वाकचौरे म्हणाले, २००९ ते २०१४ या काळात तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्याने आम्ही या मार्गासाठी पाठपुरावा केला. तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी २०१२ मध्ये या मार्गाला मंजुरी दिली होती. त्यावेळी नारायणगाव येथील रेडिओ दुर्बिण केंद्राचे कोणतेही कारण देण्यात आले नव्हते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या आणि काहींना मोबदलाही मिळाला.
या मार्गासाठी आता रेडिओ दुर्बिणीचे कारण दिले जात आहे. यावर पर्याय सुचवताना खासदार वाकचौरे म्हणाले, नारायणगाव येथील दुर्बिणीच्या लांब क्षेत्रावरून रेल्वे नेता येऊ शकते. हा मार्ग संगमनेरवरूनच नेला जावा, यासाठी आम्ही आग्रही आहोत. हा रेल्वे मार्ग संगमनेरसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगून ते म्हणाले की, या मार्गामुळे संगमनेरमधील व्यापार, शिक्षण आणि उद्योजकता वाढीस लागणार आहे. पुणे, नाशिक आणि मुंबई यासुवर्ण त्रिकोणावरील या रेल्वे मार्गामुळे परिसराच्या विकासाची गती प्रचंड वाढणार आहे.
१९ फेब्रुवारी २०२४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये हा मार्ग संगमनेर ऐवजी शिर्डी मार्गे नेण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर संगमनेरसह सर्वत्र मोठा असंतोष निर्माण झाल्याचे वाकचौरे यांनी नमूद केले. या घोषणेनंतर आपण तातडीने पाठपुरावा सुरू केला असून, या रेल्वे मार्गासंदर्भात आपण लोकसभेत तीन वेळेस प्रश्न उपस्थित केला आहे. २० ऑगस्ट २०२५ लादेखील लोकसभेत प्रश्न विचारल्याचे त्यांनी सांगितले. यापुढेही आपण पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार सत्यजित तांबे यांनी रेल्वे मार्गासाठी उभारलेल्या जनआंदोलनात आपण सहभागी असल्याचे सांगून, आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर-अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून राज्य अधिवेशनामध्ये हा मुद्दा प्रकर्षाने मांडला पाहिजे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या मार्गासाठी विनंती केली पाहिजे. राज्य आणि केंद्र मिळून आम्ही एकत्रितपणे हा मार्ग संगमनेरवरूनच करण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. नाशिक-पुणे रेल्वे संगमनेर मार्गे झाली पाहिजे, हीच जनतेची भावना आहे आणि मी जनतेसोबत आहे, असे देखील ते म्हणाले.



या मार्गासाठी आता रेडिओ दुर्बिणीचे कारण दिले जात आहे.
आमदार सत्यजित तांबे यांनी रेल्वे मार्गासाठी उभारलेल्या जनआंदोलनात आपण सहभागी असल्याचे सांगून,