संगमनेर: प्रतिनिधी
संक्रांतीचा सण आनंदाने साजरा करण्याऐवजी संगमनेर शहरात सध्या नायलॉन मांजामुळे घबराटीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने नायलॉन मांजावर कडक बंदी घातलेली असतानाही संगमनेरच्या बाजारपेठेत या मृत्यूच्या पाशाची सर्रास विक्री होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात या मांजाने अक्षरशः कहर केला असून, सलग झालेल्या चार भीषण अपघातांमध्ये नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे संगमनेरकरांच्या गळ्यावर आता नायलॉन मांजाचा सुरा फिरू लागला असून या अपघातांना जबाबदार कोण? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
शहरात नायलॉन मांजाचा विळखा इतका भयानक झाला आहे की, रस्त्यावरून प्रवास करणे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे झाले आहे. नाईकवाडपुरा येथील २३ वर्षीय तरुण हुजेब रौफ शेख हा आपल्या बहिणीला दुचाकीवरून ट्युशनला सोडायला जात असताना अचानक त्याच्या गळ्यात मांजा अडकला. प्रसंगावधान राखून त्याने मान फिरवली, मात्र यात त्याचा कान आणि गळा गंभीररीत्या चिरला जाऊन तो रक्तबंबाळ झाला.
अशीच काहीशी हृदयद्रावक घटना उंबरी बाळापूर येथील प्रवीण सारबंदे यांच्याबाबत घडली. नायलॉन मांजाचा फास हाताला बसल्याने त्यांच्या उजव्या हाताची बोटे कापली गेली असून, त्यांना कायमचे अपंगत्व येण्याची भीती निर्माण झाली आहे. याशिवाय, जोर्वे नाका परिसरात एका सायकल चालकाचा पाय कापला गेला, तर एका महिलेचा हात मांजामुळे चिरला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सर्व जखमींवर सध्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी नायलॉन मांजाची विक्री आणि वापर करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, संगमनेरमध्ये या आदेशांना स्थानिक विक्रेत्यांनी केराची टोपली दाखवल्याचे चित्र दिसत आहे. पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बंदी केवळ कागदावरच उरली असून, अंमलबजावणी करणारी यंत्रणा झोपलेली असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. जर पोलिसांनी पतंग उडविणाऱ्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली, तर हा जीवघेणा मांजा विकणारे मुख्य सूत्रधार सापडणे कठीण नाही, परंतु यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे विक्रेत्यांचे फावत आहे.
नायलॉन मांजामुळे केवळ मानवांचाच नाही, तर आकाशात भरारी घेणाऱ्या निष्पाप पक्षांचेही बळी जात आहेत. आता तरी पोलीस प्रशासनाने झोपेतून जागे व्हावे आणि नायलॉन मांजाचा साठा करणाऱ्या गोदामांवर धाडी टाकून कठोर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी समस्त संगमनेरकरांकडून केली जात आहे.
दोन-तीन दिवसांपूर्वीच या गंभीर विषयाकडे एका निवेदनाच्या माध्यमातून राहुल गांधी समर्थक संघाने (RGSS) पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर पोलिसांनी एक किरकोळ कारवाई करत माध्यमातून पाठ थोपटून घेतली. प्रत्यक्षात मात्र नायलॉन मांजामुळे जखमी होणाऱ्यांची संख्या पाहता प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा मांजा आता नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संगमनेरकरांनो सावधान! हवेत घोंगावतोय जीवघेणा ‘यमपाश’; शहरात रक्ताचे सडे!
दोन-तीन दिवसांपूर्वीच या गंभीर विषयाकडे एका निवेदनाच्या माध्यमातून राहुल गांधी समर्थक संघाने (RGSS) पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांचे लक्ष वेधले होते.








