
संगमनेर, प्रतिनिधी-
कृषी क्षेत्रात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने शिवछत्रपती प्रतिष्ठान व अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाने’ लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. थोरात कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात भरलेल्या या ज्ञानकुंभाला गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल ३ लाख ९ हजार ४७२ नागरिकांनी भेट दिली असून, संपूर्ण परिसर जनसागराने ओसंडून वाहत आहे.
माजी कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ४० एकरच्या विस्तीर्ण परिसरात हे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी मंत्री दिनेश ठाकूर, केंद्रीय पशुसंवर्धन आयुक्त प्रवीण मलिक, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. जयश्रीताई थोरात, संगमनेरच्या नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे आणि दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांच्यासह अमृत उद्योग समूहातील पदाधिकारी आणि राज्यभरातील मान्यवरांनी भेटी दिल्या.
या प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पाच एकर परिसरामध्ये उभारलेले प्रशस्त पीक प्रात्यक्षिक प्लॉट, जिथे ६९ विविध पिकांच्या ३५० जातींची माहिती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाहता येत आहे. आधुनिक यंत्रसामग्रीचा ‘मशिनरी एक्स्पो’, शैक्षणिक माहिती देणारा ‘एज्युकेशन एक्स्पो’ आणि महिला बचत गटांच्या हाताला काम देणारे विविध वस्तूंचे स्टॉल्स यामुळे या प्रदर्शनाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. डेअरी प्रदर्शनामध्ये राज्यभरातून दाखल झालेल्या २५० विविध जातींच्या गाई आणि दीड टन वजनाचा अजस्त्र वळू पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह तरुणांनी मोठी गर्दी केली आहे.
याप्रसंगी केंद्रीय पशु आयुक्त प्रवीण मलिक यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. थोरात यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात मोठी कृषी क्रांती झाली असून, एकाच ठिकाणी सर्व आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणारे हे प्रदर्शन देशपातळीवरील मानाचे प्रदर्शन असल्याचे त्यांनी नमूद केले. तर डॉ. मैथिलीताई तांबे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि महिलांच्या मोठ्या सहभागाचे कौतुक करताना, शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिल्यास आणि तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ती नक्कीच प्रगतीकारक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
या प्रदर्शनाचे आणखी एक आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील पहिले ‘ट्युलिप गार्डन’. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या काश्मीरच्या धर्तीवरील बागेला आतापर्यंत १ लाख ८० हजार नागरिकांनी भेट दिली आहे. रंगीबेरंगी ट्युलिपची फुले आणि सेल्फी पॉईंट्समुळे तरुणाईची येथे मोठी झुंबड उडाली आहे. केवळ अहिल्यानगर जिल्हाच नव्हे, तर पश्चिम बंगाल आणि कर्नाटकसारख्या राज्यांतूनही शेतकरी येथे मोठ्या संख्येने येत आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले, तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ व बाचकर जी.बी. यांनी केले. शेवटी सागर वाकचौरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.







माजी कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली
याप्रसंगी केंद्रीय पशु आयुक्त प्रवीण मलिक यांनी