

संगमनेर, प्रतिनिधी –
मंत्रालयाच्या माहिती व जनसंपर्क विभागातून थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक साहित्य आणि माहिती गहाळ झाल्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. ही केवळ साहित्याची चोरी नसून बहुजन महापुरुषांचा इतिहास पुसण्याचे एक मोठे षडयंत्र असल्याचा खळबळजनक आरोप करत, यासंदर्भात राहुल गांधी समर्थक संघाच्या (RGSS) कार्यकर्त्यांनी संगमनेरच्या प्रांताधिकार्यांना निवेदन दिले. नायब तहसीलदार मार्तंड माळवे यांनी निवेदन स्वीकारले.
या निवेदनात म्हटले आहे की, २०१७ ते २०२० या दरम्यान महात्मा फुले यांच्या कार्याशी संबंधित महत्त्वाची माहिती मंत्रालयातून गायब झाली आहे. मंत्रालयासारख्या अतिसुरक्षित ठिकाणी जर ऐतिहासिक दस्तऐवज सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. नागरिकांनी नक्की कोणाच्या भरोशावर जगायचे, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे. एकीकडे सरकारचे समर्थक महापुरुषांचा अवमान करतात आणि दुसरीकडे त्याच सरकारच्या काळात महापुरुषांचे साहित्य नष्ट होते, हे जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान असल्याचा संशय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
महात्मा फुले यांचे विचार सरकारला अडचणीचे ठरत असल्यानेच हे साहित्य गायब केले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांपासून महात्मा फुले यांचे कोणतेही नवीन साहित्य प्रकाशित झाले नसतानाही त्यावरील निधी खर्च केला जात आहे, याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
या प्रकरणाबाबत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल असूनही, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. या विज्ञानयुगात आरोपीचा शोध न लागणे ही मोठी शोकांतिका असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी आणि महापुरुषांचा इतिहास जिवंत ठेवावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
हे निवेदन देताना आर.जी.एस.एस. चे समन्वयक सतीश खताळ, राम अरगडे, अमोल शेलकर, अरुण चव्हाण, प्रकाश कडलग, अरुणकाका गावित्रे, अरुण जाधव, रवींद्र हासे आणि राजेंद्र गिरी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



या प्रकरणाबाबत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल असूनही, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. या विज्ञानयुगात आरोपीचा शोध न लागणे ही मोठी शोकांतिका असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी आणि महापुरुषांचा इतिहास जिवंत ठेवावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

