संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर नगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि वसुलीतील पारदर्शकता टिकवण्यासाठी आता बाहेरील ठेकेदारांऐवजी पालिकेच्या स्वतःच्या मनुष्यबळाद्वारे बाजार कर संकलित करावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी पथविक्रेता समितीचे सदस्य दीपक साळुंके यांनी केली आहे.
दीपक साळुंके म्हणाले की, दैनंदिन बाजार कराची पावती फाडण्यासाठी सध्या खासगी ठेकेदारांची नेमणूक केली जाते. यामुळे अनेकदा ठेकेदारांकडून होणारा हस्तक्षेप वाढतो आणि महसुलाची गळती होण्याची शक्यता असते. जर नगरपालिकेने स्वतःच्या कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ वापरून ही वसुली केली, तर जमा होणारा संपूर्ण महसूल थेट पालिकेच्या तिजोरीत जमा होईल. यामुळे पालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल आणि वसुली प्रक्रियेत शिस्त येईल.
शहरातील फेरीवाल्यांच्या प्रश्नावर बोलताना साळुंके यांनी सर्व विक्रेत्यांची कायदेशीर नोंदणी करून त्यांना अधिकृत ओळखपत्रे देण्याची मागणी केली. ओळखपत्रे असल्यास विक्रेत्यांच्या नोंदी प्रशासनाकडे राहतील. जर एखाद्या विक्रेत्याकडून गैरवर्तन घडले, तर त्याचे प्रमाणपत्र रद्द करून कायदेशीर कारवाई करणे सोपे होईल, असे त्यांनी नमूद केले.
शहरातील ‘फेरीवाला झोन’ निश्चित करताना जे विक्रेते जिथे वर्षानुवर्षे व्यवसाय करत आहेत, त्यांना तिथेच प्राधान्य द्यावे. विशेषतः भाजी विक्रेत्यांसाठी ४ ते ५ फुटांची जागा निश्चित करावी. एका कुटुंबात एकाच व्यक्तीला व्यवसाय परवाना मिळावा, मात्र विभक्त कुटुंबांच्या बाबतीत प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक आणि एकमताने निर्णय घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही साळुंके यांनी सुचवले.
फेरीवाल्यांना अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक मानून त्यांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी व्यापक मोहीम राबवावी. मात्र, ही नोंदणी प्रक्रिया नियमावलीनुसारच व्हावी, जेणेकरून त्याचा गैरवापर होणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
संगमनेर नगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी ठेकेदाराऐवजी थेट बाजार कराची वसुली करा! पालिकेच्या पथविक्रेता समिती सदस्य दीपक साळुंके यांची मागणी
यामुळे पालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल आणि वसुली प्रक्रियेत शिस्त येईल.


संगमनेर, प्रतिनिधी – 



