संगमनेर:
शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाला दिलेल्या सूचनानंतर आता शहरात वारंवार समोर येणाऱ्या गोवंश कत्तलीच्या घटनांची गंभीर दखल घेत, प्रशासनाने आज अवैध कत्तलखान्यांविरुद्ध मोठी मोहीम राबवली. आज सकाळपासूनच मोठ्या पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या (बुलडोझर) साहाय्याने हे अवैध कत्तलखाने जमीनदोस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
संगमनेरमधील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर वारंवार झालेल्या कारवाईनंतर देखील हे कत्तलखाने सुरू असल्याचे अधोरेखित झाले आहे. या विरोधात आंदोलने करणाऱ्या संघटना देखील गेल्या काही महिन्यांपासून या प्रश्नी मूग मिळून होत्या. अशा परिस्थितीत गेल्या महिनाभराच्या कालावधीमध्ये स्थानिक पोलिसांच्या सुरू असलेल्या या कत्तलखान्यांवर अहिल्यानगरच्या एलसीबीने मोठ्या कारवाया केल्या होत्या. या कारवायांमुळे संगमनेर मधील अवैध कत्तलखान्याचे प्रस्थ समोर आले होते. यापूर्वी देखील संबंधित ठिकाणांवर प्रशासनाकडून कारवाया करण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही काही ठिकाणी छुप्या पद्धतीने कत्तलखाने सुरू असल्याचे पोलीस कारवायांमधून निदर्शनास आले होते.
या पार्श्वभूमीवर संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाला सूचना देत हे कत्तलखाने पाडण्याचे निर्देश दिले होते. यापूर्वी देखील आमदार झाल्यानंतर खताळ यांनी या कत्तलखान्यांवर कारवाया घडवून आणल्यानंतर देखील कत्तलखाने सुरू होते. अखेरीस रताळ यांच्या सूचनांची संगमनेर नगरपरिषदेने कठोर दखल घेत कत्तलखाने पाडण्याची भूमिका घेतली. त्यानुसार ही कारवाई सुरू आहे.
कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे संकेत प्रशासनाने दिले आहेत. असे असले तरी प्रशासनाकडून आता संगमनेर मधील सर्व अवैध कत्तलखाने मुळासह उद्ध्वस्त केली जातात ती पुन्हा या कत्तलखान्यांमधून गोवंश जनावरांचे प्रकार समोर येतात याकडे लक्ष लागले आहे.
या धडक कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, नागरिकांमधून प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. या संदर्भात प्रशासनाकडून अधिकृतपणे काय माहिती दिली जाते याकडे लक्ष लागले आहे.





