संगमनेर, प्रतिनिधी –
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर हे सदैव सुसंस्कृत आणि वैभवशाली शहर म्हणून राज्याला परिचित आहे. याच परंपरेत आता आधुनिक सुरक्षेची जोड देण्यात आली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून आणि संगमनेर नगरपरिषदेच्या पुढाकारातून महाराष्ट्रात प्रथमच ‘रक्षक दल’ हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.
महिला, मुली आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तात्काळ सुरक्षेसाठी हे दल चोवीस तास सेवेसाठी सज्ज झाले असून, आज रविवारी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे या दलाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, दिलीप पुंड, आरोग्य समितीचे सभापती किशोर टोकसे, प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, आयडीबीआय बँकेचे मॅनेजर निखिल सावंत, विशाल बोरस्ते, विवेक आंचन, एमएसएफचे प्रकाश रावते, मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्यासह नगरसेवक, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संगमनेर शहरातील शांतता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणेला मदत म्हणून हे ‘रक्षक दल’ काम करणार आहे. शहरात कुठेही अनुचित घटना घडल्यास किंवा मदतीची गरज भासल्यास नागरिकांनी तात्काळ ९०६७२७३२७३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. संपर्क होताच हे रक्षक दल घटनास्थळी त्वरित हजर होईल. या उपक्रमासाठी आयडीबीआय बँकेने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून नगरपरिषदेला एक चारचाकी वाहन आणि दोन बुलेट गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या वाहनांच्या माध्यमातून जवान शहराच्या कानाकोपऱ्यात गस्त घालणार आहेत.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असून महिलांचा सन्मान आणि नागरिकांची सुरक्षा हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य आहे. महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचे सुरक्षा दल एखाद्या नगरपरिषदेने स्थापन केले आहे. हे दल केवळ संरक्षणाचे काम करणार नाही, तर महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या समाजकंटकांसाठी ही एक मोठी चपराक ठरेल.
नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संगमनेर नगरपरिषदेच्या प्रत्येक विकासकामात नागरिकांचा सक्रिय सहभाग असतो. शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच नागरिकांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सर्वांना सोबत घेऊन संगमनेरला सुरक्षित आणि प्रगत बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोजना पगडाल यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सीमा खटाटे यांनी मानले. या कार्यक्रमाला संगमनेर शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलांची मोठी उपस्थिती होती.☀️ नगराध्यक्षांनी स्वतः चालवले सुरक्षा वाहन; शहरातून निघाली भव्य रॅली – जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या या रक्षक दलाचे सामर्थ्य दाखवण्यासाठी शहरातून एक भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे स्वतः नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांनी रक्षक दलाचे चारचाकी वाहन चालवून नेतृत्त्व केले. या रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले असून, नगरपरिषदेच्या या धाडसी निर्णयाचे संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.





