शिर्डी:
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष सांस्कृतिक आणि निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून अविस्मरणीय करण्यासाठी एक सर्वंकष कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.
विधान भवनात या आराखड्याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेटे, स्वप्नील काळे यांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष हा एक ऐतिहासिक टप्पा असून, या निमित्ताने राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विशेष समितीची स्थापना केली आहे. या महोत्सवांतर्गत जलाशय परिसराचे सुशोभीकरण करणे, सांस्कृतिक वारसा जपणे आणि पर्यटन विकासाला चालना देणे यावर प्रामुख्याने भर दिला जाणार आहे. जलसंपदा विभागाने तयार केलेला हा विशेष आराखडा लवकरच अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांसमोर सादर केला जाईल, अशी माहिती मंत्री विखे यांनी दिली.
या धरणामुळे गेल्या शंभर वर्षांत जिल्ह्याच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीत जे क्रांतिकारी बदल झाले आहेत, ते नव्या पिढीसमोर प्रभावी सादरीकरणाच्या माध्यमातून मांडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या शताब्दी महोत्सवासाठी एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण ‘लोगो’ तयार करण्यात येणार असून, वर्षभर दरमहा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या उपक्रमांमध्ये स्थानिक कलाकारांना जास्तीत जास्त संधी देऊन त्यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या वाटा शोधण्यावरही मंत्र्यांनी भर दिला. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जलक्रीडा आणि पाण्यावर आधारित इतर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
शताब्दी महोत्सवाची व्याप्ती केवळ धरणापुरती मर्यादित न ठेवता ती लाभक्षेत्रातील अंतिम चारीपर्यंत असावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. या ऐतिहासिक सोहळ्याची माहिती जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट विकसित करावी आणि समाजमाध्यमांद्वारे या महोत्सवाचा व्यापक प्रचार व प्रसिद्धी करावी, असे आदेश विखे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.





