महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
निरोगी आणि सुदृढ समाज निर्मितीसाठी कटिबद्ध असलेल्या ‘जयहिंद लोकचळवळी’च्या वतीने अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेले पाचदिवसीय निवासी युवा सर्वांगीण विकास शिबिर नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून भविष्यातील विज्ञाननिष्ठ विचारांची सुदृढ पिढी घडवली जाईल, असा दृढ विश्वास संस्थेचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला. शिबिराच्या समारोप प्रसंगी ते उपस्थित विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संवाद साधत होते.
डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या भाषणात युवकांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. ते म्हणाले की, देशाच्या प्रगतीसाठी तरुणांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होणे ही काळाची गरज आहे. समाजातील आर्थिक विषमता जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत देश खऱ्या अर्थाने प्रगत होऊ शकणार नाही. अशा शिबिरांच्या माध्यमातून मुलांमध्ये सामाजिक भान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, विद्यार्थ्यांनी आपापल्या गावांमध्ये वाचन चळवळ सुरू करण्याचे आवाहन करत त्यासाठी जयहिंद लोकचळवळीच्यावतीने पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
पाच दिवस चाललेल्या या निवासी शिबिरात ११ ते १६ वयोगटातील १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सकाळच्या सत्रात योगासने, एरोबिक्स आणि विविध व्यायामाचे प्रकार घेण्यात आले, तर सायंकाळच्या सत्रात मैदानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. यामध्ये पथनाट्य, अभिनय, नृत्य, गायन आणि झांज पथक अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.
बौद्धिक सत्रात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. बाबा खरात यांनी पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले, तर शिवाजी नाईकवाडी यांनी मानवी मूल्यांची रुजवणूक केली. हिरालाल पगडाल यांनी महात्मा गांधींच्या विचारांमधील वास्तव आणि समज-गैरसमज यावर प्रकाश टाकला. स्वप्निल मानव यांनी ‘आजचा युवक’ या विषयावर मुलांशी संवाद साधला, तर अमृतवाहिनी मॉडेल स्कूलचे प्राचार्य आशिष कुमार यांनी करिअर निवडीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

शिबिरात केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीवर भर देण्यात आला. मातीकाम, पेंटिंग, कागदकाम, ओरिगामी आणि हॉर्स रायडिंग यांसारख्या कौशल्यांमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता. यासोबतच साहसी खेळ, रायफल शूटिंग, स्काऊट गाईड, प्रथमोपचार, ट्रेकिंग आणि छायाचित्रण अशा वैविध्यपूर्ण विषयांचे प्रशिक्षण वैभवी आढाव, प्रा. कोमल मस्के, धनश्री टाकळकर, दिपाली गायके, समाधान जाधव आणि तेजस पवार यांच्यासह अनेक तज्ज्ञ प्रशिक्षकांनी दिले.
शिबिराचा अनुभव इतका आनंददायी होता की, समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी डॉ. तांबे यांच्याकडे पुढील शिबिराचा कालावधी वाढवून देण्याची मागणी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत सुट्टीच्या काळात पुन्हा अशाच उपक्रमाचे आयोजन करण्याचे संकेत डॉ. तांबे यांनी दिले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य आशिष कुमार, शोभा हजारे, अनंत शिंदे, बजरंग जेडगुले आणि हर्षल थेटे यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी राजेंद्र जोरावर, विलास दिघे यांच्यासह पालक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.






