महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाइन संगमनेर: नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात सतत सुरू असलेल्या पावसामुळे आज (मंगळवारी) दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान अचानक दरड कोसळल्याची घटना घडली आहे. घाटातून जाणाऱ्या महामार्गावरील मलबा हटवण्याचे काम प्रशासनाकडून वेगाने सुरू आहे.
गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे घाटातील मोठे दगड आणि मातीचा ढिगारा कोसळून थेट रस्त्यावर आला आहे. यामुळे या महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या येणारी-जाणारी वाहने एकाच बाजूने वळविण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासकीय यंत्रणा आणि मदतकार्य पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या रस्त्यावरील मोठे दगड आणि मलबा बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असली, तरी ती पूर्वपदावर आणण्यासाठी वेगाने प्रयत्न केले जात आहेत. सद्यस्थितीत घाटातील वाहतूक संथ गतीने सुरू असून, वाहनचालकांनी अत्यंत काळजीपूर्वक प्रवास करावा आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.