अनंत पांगारकर-
कचऱ्याचे साम्राज्य, जागोजागी पडलेले ढीग आणि दुर्गंधीच्या विळख्यात अडकलेल्या एखाद्या शहराचे रूप पालटून त्याला राज्यातील एक प्रगतशील, स्वच्छ आणि ‘झाडांचे शहर’ बनवणे ही अत्यंत आव्हानात्मक गोष्ट असते. मात्र, जेव्हा एखादी महिला आपल्या शहराला केवळ एक भौगोलिक क्षेत्र न मानता स्वतःचे मोठे घर मानते, तेव्हा तिथे परिवर्तनाची एक नवी आणि सोनेरी पहाट उजाडते. संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष आणि जयहिंद महिला मंचच्या अध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी नेमका हाच अद्भूत चमत्कार संगमनेर शहरात करून दाखवला आहे. म्हणूनच, ‘कचऱ्यात हरवलेली बाई’ अशी स्वतःची प्रांजळ आणि सार्थ ओळख करून घेत, त्यांनी कचरा निर्मूलनाचा आणि शहर सौंदर्यीकरणाचा जो वसा घेतला, तो आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श वस्तुपाठ ठरला आहे.
आजच्या आधुनिक काळात एका बाजूला सिमेंटची जंगले वेगाने वाढत आहेत आणि नागरीकरणासोबतच कचऱ्याची समस्या कमालीची गंभीर होत चालली आहे. या बिकट परिस्थितीत दुर्गाताईंनी शहराच्या नगराध्यक्ष म्हणून केवळ घोषणा न देता थेट समस्येच्या मुळावर घाव घालण्याचे ठरवले. थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संतसाऊलीत आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना समाजकारणाचे बाळकडू मिळाले होते. याच संस्कारांच्या जोरावर त्यांनी केवळ शासकीय योजनांवर किंवा प्रशासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता स्वतःला या स्वच्छता मोहिमेत पूर्णपणे झोकून दिले.
शहरातील प्रत्येक घरातील कचऱ्याचे व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने कसे व्हावे, ओला व सुका कचरा कसा वेगळा करावा, यासाठी त्या स्वतः अधिकार्यांसह आणि कार्यकर्त्यांसह थेट नागरिकांच्या दारापर्यंत, घराघरात पोहोचल्या. विविध कार्यक्रम, शाळांमधून त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करत बाल मनावर कचरा मुक्तीचे शिक्षण बिंबवले. कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे योग्य पद्धतीने विघटन करण्यासाठी त्यांनी शहरात मोठे प्रकल्प राबवले आणि संगमनेरला डम्पिंग ग्राउंडच्या कायमस्वरूपी त्रासातून मुक्त केले. त्यांच्या याच अथक आणि सातत्यपूर्ण परिश्रमांचे फलित म्हणून संगमनेर नगरपालिकेला देश व राज्य पातळीवर अनेक सर्वोच्च पुरस्कारांसह तब्बल १० कोटी रुपयांची बक्षिसे मिळाली. याशिवाय त्यांच्या नेतृत्वाखाली पालिकेने उभारलेला कचऱ्यापासूनचा खत प्रकल्प आज पालिकेच्या उत्पन्नात मोठी भर घालत आहे.
दुर्गाताईंचा ध्यास केवळ शहरातील कचरा उचलण्यापुरता किंवा रस्ते झाडण्यापुरता मर्यादित नव्हता, तर त्या कचऱ्याच्या जागी नयनरम्य हिरवाई फुलवण्याचा होता. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी २००६ साली सुरू केलेल्या ‘दंडकारण्य अभियानाची’ धुरा प्रकल्प प्रमुख म्हणून समर्थपणे सांभाळत त्यांनी संगमनेरला ‘ग्रीन सिटी’ आणि गार्डन सिटीचे मूर्त रूप दिले. पावसाचा लहरीपणा, कडक उन्हाळा आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात ढासळत चाललेला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यांनी शहराच्या कानाकोपऱ्यात वृक्षारोपणाची मोठी चळवळ उभी केली.
नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि विरंगुळ्यासाठी त्यांनी शहरात २५ पेक्षा अधिक सुंदर बगीचे, अत्याधुनिक ओपन जीम आणि वॉकिंग ट्रॅकची निर्मिती केली. आज संगमनेरमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला इथली शुद्ध, आल्हाददायक हवा आणि रस्त्यांच्या दुतर्फा डोलणारी हिरवीगार झाडे आकर्षित करतात. भविष्यात संगमनेर शहर हे एक थंड हवेचे ठिकाण म्हणून नावारूपास यावे, याच ध्येयाने त्यांनी लाखो वृक्षांची लागवड व जोपासना केली आहे.
या संपूर्ण कचरा निर्मूलन आणि पर्यावरण मोहिमेत दुर्गाताईंनी तालुक्यातील ४००० महिला बचत गटांना एकत्र आणून एक अभूतपूर्व शक्ती उभी केली. १९९८ मध्ये जयहिंद महिला मंचच्या माध्यमातून सुरू झालेल्या या चळवळीत आज त्यांच्या सोबतीने हजारो महिला कार्यरत आहेत. या बचत गटांमधील महिलांनी केवळ आपल्या घरचा कचराच व्यवस्थापित केला नाही, तर विविध रोपवाटिका, परसबागा, घराच्या गच्चीवर भाजीपाला फुलवत शहराच्या या हरित क्रांतीत आपले योगदान दिले. महिलांचे आर्थिक सबलीकरण करत असतानाच त्यांना पर्यावरणाच्या या ऐतिहासिक लढ्यात मुख्य सैनिक बनवण्याचे काम ताईंनी केले.
स्वच्छता आणि कचरा निर्मूलनाचा हा भक्कम पाया असल्यामुळेच आज संगमनेरमध्ये नव्याने झालेले हायटेक बसस्थानक, चौपदरी रस्ते, भूमिगत गटार योजना, अद्ययावत क्रीडा संकुल आणि सुंदर बायपास रस्ते दिमाखात उभे राहू शकले. दिवस-रात्र अविरतपणे जनसंपर्कात राहणाऱ्या आणि शहरातील प्रत्येक घरातील नागरिकाची व त्यांच्या परिसरातील झाडांची खडान् खडा माहिती ठेवणाऱ्या दुर्गाताई खऱ्या अर्थाने संगमनेरची माऊली ठरल्या आहेत. समाजकारणासोबतच साहित्याची गोडी जपत त्यांनी काही पुस्तकांचे संपादनही केले आहे. अशा या अष्टपैलू, स्मरणशक्ती दांडगी असलेल्या आणि कचऱ्याचे निर्मूलन करून संगमनेरला राज्याच्या नकाशावर वैभवाच्या शिखरावर नेणाऱ्या हरित क्रांतीच्या जननीला वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा!






