महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथे एका बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात अर्जुन शिरसाठ हा युवक जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली असून, या पहिल्याच मानवी हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काकडवाडी येथील मुळे वस्तीवरील शांताराम मुळे यांच्या घराजवळील शेतात, एका गवताळ कोरड्या भागात हा बिबट्या दबा धरून बसला होता. अर्जुन शिरसाठ हा युवक आपल्या मोटरसायकलवरून प्रवास करत असताना बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली.
या प्राणघातक हल्ल्यातून अर्जुन अत्यंत सुदैवाने बालंबाल बचावला आहे. त्याच्या पाठीवर बिबट्याच्या नखांचे ओरखडे उमटले असून त्याला तातडीने घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
काकडवाडीत बिबट्याने मानवावर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी या भागात बिबट्याकडून शेळ्या, गाई आणि इतर लहान पाळीव प्राण्यांची शिकार झाली होती, मात्र थेट मानवी हल्ल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संगमनेर वनविभागाने तात्काळ घटनास्थळी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच जखमी युवकाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च वनविभागाने करावा, अशीही मागणी होत आहे. दरम्यान, नागरिकांनी विशेषतः चारा कापताना आणि प्रवास करताना पूर्णपणे सावध राहावे व योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुकाध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी केले आहे.