महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जिल्ह्यात जोरदार पुनरागमन केले असून भंडारदरा, मुळा आणि कुकडी समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पुनर्वसु नक्षत्राच्या सरींचे तांडव सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले ओसंडून वाहत असून धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे.
भंडारदरा धरण आज (मंगळवारी) संध्याकाळपर्यंत निम्मे भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, तर मुळा नदीला छोटा पूर आल्याने धरणाचा साठा ३० टक्क्यांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. दरम्यान, अतिवृष्टी आणि सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने भंडारदरा आणि मुळा पाणलोटातील सर्व प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांना पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे. निळवंडे धरणाचा साठाही २० टक्क्यांवर- भंडारदरा धरण क्षेत्रात रविवारी आणि सोमवारी झालेल्या तुफान पावसामुळे २४ तासांत विक्रमी १०३३ दलघफू नवीन पाणी दाखल झाले असून धरणाचा एकूण साठा ४५३२ दलघफू म्हणजेच ४१ टक्क्यांवर पोहोचला आहे. ११२ दलघफू क्षमतेचा वाकी तलाव सोमवारी ओव्हरफ्लो झाला असून त्याचे पाणी निळवंडे धरणात वेगाने जमा होत आहे. त्यामुळे निळवंडे धरणाचा साठाही २० टक्क्यांवर गेला आहे. दुसरीकडे, हरिश्चंद्रगड आणि आंबित परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुळा नदीच्या विसर्गात मोठी वाढ होऊन कोतूळ येथील कोतूळेश्वर मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे.
मुळा धरणात ६४६९ दलघफू साठा झाला असून आज त्यात आणखी मोठी आवक अपेक्षित आहे. दक्षिण नगर जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कुकडी समूहातील धरणांमध्येही गेल्या ३४ तासांत १७३१ दलघफू नवीन पाणी आले असून, या समूहातील डिंभे धरणात सर्वाधिक ५१२ दलघफू पाण्याची आवक नोंदवण्यात आली आहे.
पावसाच्या या रौद्र रूपामुळे आदिवासी भागात झाडे उन्मळून पडली असून घरांचे आणि भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर भागात ढगफुटीचा इशारा दिल्यामुळे गोदावरी नदीकाठच्या कोपरगाव आणि नेवासा येथील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या मुसळधार पावसामुळे एकीकडे शेतकरी आणि पंढरपूरला जाणारे वारकरी सुखावले असले, तरी सुरक्षेच्या कारणास्तव कळसूबाई शिखर, सांदनदरी, रतनगड, कोकणकडा आणि इतर धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास वन आणि महसूल विभागाने सक्त मनाई केली आहे.