सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना ‘भाडे के तट्टू’ किंवा ‘बघून घेईन’ अशा धमक्या देणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शोभत नाही आणि ‘देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्र नाही’ हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारच्या कथित भ्रष्टाचारावर आणि शेतकरी विरोधी धोरणांवर कडक शब्दांत आक्षेप घेतला.
हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की, सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ‘कुत्रे’ किंवा ‘भाड्याचे तट्टू’ यांसारखे शब्द शोभा देत नाहीत, कारण ही टपोरी लोकांची भाषा आहे. लोकशाहीत सरकारच्या कामावर प्रश्न विचारण्याचा जनतेला आणि विरोधी पक्षांना पूर्ण अधिकार आहे.
काँग्रेस पक्षाने मिसिंग लिंकच्या कामातील कथित भ्रष्टाचाराची पोलखोल करून फडणवीसांना ‘डिझास्टर मॅन’ म्हटल्यामुळेच त्यांचा अहंकार दुखावला आहे आणि त्यांना संताप आला आहे. फडणवीस हे स्वतःच्या घरच्या पैशातून काम करत नसून जनतेच्या पैशाचा अपव्यय होत असेल, तर जनता हिशोब नक्कीच विचारणार, असे सांगत सपकाळ यांनी फडणवीसांच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला.
फडणवीसांनी आपल्यावर केलेल्या खोटेपणाच्या आरोपाला चोख उत्तर देताना सपकाळ यांनी थेट नार्को टेस्टचे आव्हान दिले आहे. आपण स्वतः नार्को टेस्टसाठी तयार असल्याचे सांगत त्यांनी फडणवीसांनाही यासाठी तयार आहात का, असा सवाल केला. नाशिकमधील काँग्रेसचे आंदोलन रोखण्यासाठी फडणवीसांनीच ढगफुटीची अफवा पसरवली होती, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
यासोबतच वेगळा विदर्भ, आरक्षण, लाडकी बहीण योजना, समृद्धी महामार्गातील कथित भ्रष्टाचार आणि मुंबईतील जमिनींची विक्री या सर्व मुद्द्यांवर खरे-खोटे काय ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर येण्यासाठी नार्को टेस्ट झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना सपकाळ यांनी महायुती सरकारला ‘शेतकरी विरोधी’ संबोधले. भाजपा महायुती सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफीची घोषणा पूर्णपणे फसवी आहे, हे आता सिद्ध झाले असून सरकारने केवळ घोषणाबाजी केली पण प्रत्यक्षात अद्याप कर्जमाफी दिलेली नाही, असा आरोप त्यांनी केला. या फसवणुकीविरोधात राज्यात काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या वतीने तीव्र आंदोलने केली जात आहेत. सरकार केवळ चर्चेचे ढोंग रचून विरोधकांना बोलावते, परंतु प्रत्यक्षात कोणतीही सकारात्मक चर्चा करत नाही, ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असल्याचे सांगत सपकाळ यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.