माझ्या रक्तात लोकशाहीचा आदर आणि संस्कारात सभागृहाचा सन्मान, विधिमंडळ कालही पवित्र होते आणि उद्याही राहील : माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांचे विरोधकांना चोख उत्तर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळातील पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या संस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पत्रक जारी करत विरोधकांच्या आरोपांना अत्यंत जळजळीत आणि चोख उत्तर दिले आहे. राजकीय फायद्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन एखाद्याच्या संस्कारांवर प्रश्न उपस्थित करणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत, ज्यांना कसलेही भान नाही अशा विरोधकांच्या प्रश्नांना आपण उत्तर देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांचे हे पत्र सध्या राजकीय वर्तुळात आणि समाज माध्यमांवर विशेष चर्चेत आले आहे.
आपली भूमिका मांडताना दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, मी भारतीय लोकशाहीचा मनापासून आदर करते आणि लोकशाहीचे पवित्र मंदिर असलेल्या विधिमंडळाबद्दल माझ्या मनात नेहमीच नितांत आदर राहिला आहे. मी स्वतः लोकांनी निवडून दिलेली संगमनेर शहराची नगराध्यक्ष म्हणून तब्बल साडेबारा वर्षे काम केले असून सभागृह चालवले आहे. त्यामुळे एक लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहाची प्रतिष्ठा, मर्यादा आणि परंपरा जपण्याचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. आपण स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांची मुलगी असून ज्या पिढीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आणि लोकशाहीची पायाभरणी केली, त्याच पिढीचे संस्कार आपल्यावर असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले.
आपल्या कुटुंबाच्या संसदीय परंपरेचा दाखला देत त्यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले. त्यांचे बंधू बाळासाहेब थोरात यांनी तब्बल ४० वर्षे विधिमंडळात जनतेचा आवाज मांडला आहे, पती डॉ. सुधीर तांबे यांनी १४ वर्षे विधानपरिषदेच्या वरिष्ठ सभागृहात काम केले आहे, तर आज त्यांचा मुलगा आमदार सत्यजीत तांबे देखील याच विधिमंडळात जनतेचे प्रश्न मांडत आहे. ज्या कुटुंबातील चार पिढ्यांनी लोकशाहीवर श्रद्धा ठेवली आणि लोकांनी दिलेल्या जबाबदारीचा सन्मान केला, त्या कुटुंबातील व्यक्ती विधिमंडळाचा अपमान करेल, असा आरोप करणे हे केवळ चुकीचेच नसून अत्यंत वेदनादायी आहे. आमच्या परिवाराला ओळखणारे आणि मला जवळून पाहणारे कोणतेही सुजाण नागरिक या खोट्या आरोपांवर कधीही विश्वास ठेवू शकत नाहीत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेवटी दुर्गाताई म्हणाल्या की, राजकारणात विरोध करा, टीका करा आणि विचारांची लढाई लढा, हीच तर लोकशाहीची खरी सुंदरता आहे. परंतु, शब्दांचा खोटा अर्थ काढून आणि जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणे ही लोकशाहीची परंपरा नाही. माझ्या रक्तात लोकशाहीचा आदर आहे, संस्कारात संसदीय सभागृहांचा सन्मान आहे आणि आयुष्यात केवळ लोकसेवेचीच वाट आहे. त्यामुळे विधिमंडळ माझ्यासाठी कालही पवित्र होते, आजही पवित्र आहे आणि उद्याही पवित्रच राहील, असे सांगत त्यांनी भान नसलेल्या टीकाकारांना उत्तर देण्याचे साफ नाकारले आहे.