महाराष्ट्र संवाद न्यूज
एखाद्या मंत्र्याच्या घरावर मोर्चा नेणं माझ्या मनाला पटत नाही, खरंतर असा मोर्चा प्रांताधिकारी अथवा कलेक्टर कचेरीवर काढायला हवा या मताचा मी आहे. डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्ट पार्टीचा हा मोर्चा आहे. मोर्चेकरांच्या प्रश्नासोबत आम्ही आहोत, अशी भूमिका काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली आहे.
किसान सभेसह विविध संघटनांचा अकोलेपासून महसूल मंत्र्यांच्या लोणीतील कार्यालयावर पायी मोर्चा बुधवारी निघत असून तीन दिवस हा मोर्चा चालणार आहे. नैसर्गिक आपत्ती व राज्यात सुरू असलेल्या नीतिभ्रष्ट राजकारणाचा परिणाम म्हणून शेतकरी, कामगार, शेतमजूर, कर्मचारी श्रमिकांचे मुलभूत प्रश्न अत्यंत तीव्र झाले आहेत. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे सामान्य जनतेचे व विकासाचे प्रश्न संपूर्णपणे बाजूला फेकले गेले आहेत. पक्ष फोडण्याची राजकीय आमिषे व तुरुंगाची भीती दाखवून सत्ता मिळविण्यात बहुतांश प्रस्थापित राजकीय नेते व पक्ष मशगुल झाले असल्याने, अखेर पुन्हा एकदा जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणे अनिवार्य झाले.
किसान सभेच्या पुढाकाराने या पार्श्वभूमीवर दिनांक २६, २७, २८ एप्रिल २०२३ रोजी अकोले ते लोणी असा जबरदस्त राज्यव्यापी पायी मोर्चा काढण्यात येत आहे. अखिल भारतीय किसान सभा, सीटू, बांधकाम कामगार फेडरेशन, अखिल गुरव समाज संघटना तसेच शेतमजूर युनियन, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय या समविचारी संघटनांच्या सहभागाने आयोजित हा मोर्चा तीन दिवस पायी चालून, महसूल व दुग्धविकास मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चातील मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मोर्चाचे रूपांतर लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलनात करून लढा तीव्र केला जाणार आहे.
या संदर्भात पत्रकार परिषदेत सोमवारी माजी मंत्री थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्ट पार्टीचा हा मोर्चा आहे. कॉम्रेड अजित नवले हे तरुण कार्यकर्ते असून शेतकऱ्यांचे कामगारांचे विषय घेऊन काम करतात, याचा मला कायम आनंद वाटतो. नवलेसारखे पुरोगामी विचारांचे नवीन कार्यकर्ते तयार होणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रश्नांसोबत आम्ही आहोत. त्यांच्या हेतूबद्दल बिलकुल शंका नाही मात्र मंत्र्यांच्या घरावर असा मोर्चा नेणं हे माझ्या मनाला पटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

