महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर – शिर्डी येथे होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय कार्यक्रमात सर्व विभागांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करावा, अशा सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्या.
आढावा बैठक: शिर्डी विमानतळ, काकडी येथे 6 ऑगस्टला आयोजित करण्यात आलेल्या “शासन आपल्या दारी” कार्यक्रमाच्या पूर्व तयारी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री विखे पाटील बोलत होते.
यांची होती उपस्थिती: बैठकीला जिल्हाधिकारी सिध्दाराम सालिमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री विखे म्हणाले, शासन आपल्या दारी कार्यक्रमाची जनजागृती गावागावापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी नियोजन करावे. कार्यक्रमात सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी कार्यक्रमस्थळी आणण्याची व परत सोडण्यासाठी एसटी वाहतूक व्यवस्था करावी, कार्यक्रम स्थळी भोजन व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, पिण्याचे पाणी आदि सर्व सुविधांचे सुक्ष्म नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी करावा.
यांच्या कामासंदर्भात घेतला आढावा: बैठकीत महसूल विभाग, आरोग्य विभाग, वाहतुक विभाग, सार्वजनिक बांधकाम आदि विभागांचा आढावा घेण्यात आला. कार्यक्रमाला सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

