संगमनेर तालुक्यातील मांडवे आणि बिरेवाडी गावांच्या हद्दीवर नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या पोल्ट्री शेडवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी बिरेवाडी येथील संतोष माणिक गळंगे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज शुक्रवारपासून (१४ ऑगस्ट) बिरेवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाकडून प्रत्यक्ष कायदेशीर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा ठाम इशारा त्यांनी दिला आहे.
संतोष गळंगे यांनी मांडवे बुद्रुक हद्दीत आपल्या घरापासून अवघ्या ५० फुटांवर असलेल्या अनधिकृत पोल्ट्रीवर कारवाई करण्याची आणि बिरेवाडी हद्दीतील दोन पोल्ट्रींची ‘ना हरकत प्रमाणपत्रे’ (एनओसी) रद्द करून त्या सीलबंद करण्याची प्रमुख मागणी लावून धरली आहे. परिसरात तीन पोल्ट्री शेड कार्यरत असल्याने अस्वच्छता, प्रचंड दुर्गंधी आणि माशांचा उपद्रव वाढला आहे. मृत कोंबड्यांची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून, सांडपाणी व विष्ठेच्या व्यवस्थापनासाठी शोषखड्डे आणि काँक्रीटीकरण न केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
आपल्या कुटुंबाच्या आरोग्य व सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करताना, आपले बंधू भारतीय सैन्यात कार्यरत असून त्यांचे कुटुंब याच परिसरात वास्तव्यास असल्याचे गळंगे यांनी स्पष्ट केले. शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिन्ही पोल्ट्रींची संयुक्त पाहणी व मोजणी करून नियमबाह्य आढळणाऱ्या शेडवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी त्यांची मागणी आहे. यापूर्वी वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने त्यांना हे पाऊल उचलावे लागले आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाच हे आमरण उपोषण सुरू झाल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाची मोठी अडचण झाली आहे. दुसरीकडे पोल्ट्रीधारकांमध्येही खळबळ उडाली असून, या गंभीर समस्येवर प्रशासन नेमका काय तोडगा काढते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.