अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई
महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर – राज्यात सर्वत्र महसूल सप्ताह सुरू असताना नाशिकमध्ये एक तहसीलदार लाच स्वीकारतो, ही शरमेची बाब आहे. अशा लाचखोर अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून न घेण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलून नियमात कठोर बदल करण्याचा इशारा देत अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत राज्याचे महसूल मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.
शिर्डीत होणार कार्यक्रम: शुक्रवारी (ता. 11 ऑगस्ट) शिर्डी येथे “शासन आपल्या दारी” हा कार्यक्रम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी ते अहमदनगर येथे आले होते. महसूल विभागाच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार संग्राम जगताप, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, आयुक्त पंकज जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
शरमेची बाब: विखे म्हणाले, महसूल सप्ताह सुरू असताना लाच घेतल्याच्या कारणावरून नाशिकमध्ये तहसीलदारास अटक झाली आहे. ही शरमेची बाब आहे. वास्तविक भ्रष्टाचार केल्यानंतर संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र अनेकांना आपण सेवेत परत घेतो, त्यामुळेच बहुतेकदा म्हणावा असा फरक पडत नसल्याने असे प्रकार वाढत आहेत.
कायद्यात बदल: या पुढील काळात लाच घेतल्यानंतर लाचखोराला योग्य शिक्षा झाली पाहिजे, त्याकरता कायद्यात बदल करण्याची गरज निर्माण झाली असून यासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलून यावर निर्णय घेतला जाईल.
अवैध धंदे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई: अहमदनगरमध्ये गुन्हेगारीला जातीय वळण देण्याचे काम सुरू आहे. अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे देखील ते म्हणाले.
कार्यक्रमाचा खर्च महत्त्वाचा नाही: “शासन आपल्या दारी” हा कार्यक्रम शिर्डीत होणार असून या कार्यक्रमासाठी किती खर्च येईल, हे महत्त्वाचे नाही. तर लाभार्थ्याला लाभ मिळाला पाहिजे हा त्या मागचा उद्देश आहे. लाभार्थी संख्या तीस हजार असल्याने त्यांना नेण्या-आणण्यासाठी शासन खर्च करणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे.
शासन नागरिकांची दक्षता घेणार: राज्यात डोळ्याची साथ असली तरी शासन हा कार्यक्रम घेत असल्याने नागरिकांची सर्व दक्षता शासन घेणार आहे. कार्यक्रम सरकारचा असल्यामुळे सरकार याची दखल घेईल यासंदर्भात चिंता करण्याचे काही कारण नसल्याचेदेखील विखे म्हणाले.

