जनतेला दिलासा देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलपणे काम करावे
के.के. रेंज व अहमदनगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर – गत वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापराबरोबरच उपलब्ध संसाधनांचा प्रभावीपणे वापर करावा. जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलपणे काम करण्याचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
यांच्या उपस्थितीत झाली बैठक: सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी उपस्थित होते.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, गतवर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे पिण्यासाठी व सिंचनासाठीच्या वापराचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे. पाण्याचा अपव्यय होणार नाही, यादृष्टीने काळजी घ्या. पाऊस कमी झाल्यामुळे गावातून टँकरद्वारे पाणी पुरवठयाच्या मागण्या प्राप्त होतील. ज्या-ज्या गावातून टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी येईल अश्या ठिकाणी टँकर मंजूर करत पाणी पुरवठ्याला प्राधान्य द्या. गावामध्ये पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक ठरविण्यात यावे. प्रत्येक टँकरवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. नागरिकांची तक्रार येणार नाही याची काळजी घ्या.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला चारा सरकार विकत घेणार: जनावरांना पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला चारा विकत घेण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांना चारा बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांनी उत्पादीत केलेला चारा शासन खरेदी करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना चारा उत्पादनासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. तातडीने किती चारा उपलब्ध होऊ शकतो याची माहिती घेण्याच्या सूचना पालकमंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी उपस्थित लोक प्रतिनिधीनी टंचाई परिस्थितीबाबत सूचना मांडल्या. बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
के.के. रेंज व अहमदनगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा…
के.के. रेंजचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावरून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील. यासंदर्भात संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांशी आपण वैयक्तिक चर्चा करत आहोत. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लोणी येथे येत आहेत. त्यांच्या माध्यमातून के.के. रेंजचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आरक्षित जमिनीबाबत शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. तसेच अहमदनगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने व विहित वेळेत पुर्ण करण्यात यावे. हे काम करत असताना कामाचा दर्जा व गुणवत्ता उच्च दर्जाची राहील याची काळजी घेण्याच्या सुचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

