महाराष्ट्र संवाद न्यूज
शिर्डी – भारताची अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे. पुढील तीन वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असेल. भारत विकसित राष्ट्र होण्यात सहकार क्षेत्राचे योगदान आहे. देशाच्या सहकार क्षेत्राच्या विकासात महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे अमूल्य योगदान आहे, असे गौरवोद्गार देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले.
पुरस्कार वितरण सोहळा: प्रवरानगर येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंतीचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर येथील नियोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे होते.
उपस्थिती: व्यासपीठावर महसूल, पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आ. संग्राम जगताप, आ. आशुतोष काळे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.
मराठीत भाषणाची सुरुवात: “तूम्हा सर्व बंधू-भगिनींना नमस्कार” अशा मराठी भाषेत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी भाषणाला सुरूवात केली. ते म्हणाले, देशात सहकार चळवळ यशस्वी झाली आहे. स्वतंत्र सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. सहकार क्षेत्राला पुनर्जीवित करण्याचे काम शासन करत आहे. संघटीत राहून काम करणे हे सहकार चळवळीचे मर्म आहे. सहकारातून समृद्धीकडे हा देशाचा मूलमंत्र आहे.
साहित्यिकांनी आसूड ओढावेत: भारतीय लोकशाही हे सहकाराचे सर्वात मोठे उदाहरण आहे. महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणात सहकार क्षेत्राने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. समाजाला एकसंघ ठेवण्यात कला व साहित्य क्षेत्राची महत्त्वाची भूमिका असते. समाजाला दिशा देण्याचे काम ते करतात. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरावर आसूड ओढण्याचे काम साहित्यिक व कलाकरांनी करावे, असेही ते म्हणाले.
सन्मान: यावेळी संरक्षण मंत्री व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. स्वच्छता भारत मोहीमेअंतर्गत ग्रामपंचायतीना चारचाकी वाहनांचे वितरण करण्यात आले. चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. 

