महाराष्ट्र संवाद न्यूज
शिर्डी – एक कर्तव्यदक्ष संरक्षण मंत्री म्हणून राजनाथ सिंह यांची देशाला ओळख आहे. पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे देशाची ताकद निश्चितच वाढली आहे. चीन व पाकिस्तानसारख्या शेजारील राष्ट्रांना आपल्या कणखर शब्दात त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे जगभरात आज भारताचे नाव आदराने घेतले जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
पुरस्काराचे वितरण: प्रवरानगर (शिर्डी) येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंतीचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी अमळनेर येथील नियोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे होते.
यांची उपस्थिती: महसूल, पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आ. संग्राम जगताप, आ. आशुतोष काळे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात पावसाने ओढ दिली आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे आहे. अडचणीच्या काळात शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. श्री साईबाबा चरणी चांगला पाऊस पडावा यासाठी साकडे घातले आहे.
वटवृक्ष: सहकार क्षेत्राला पुढे नेण्यासाठी केंद्र सरकारने सहकार मंत्रालय स्थापन केले. सहकार क्षेत्राला दहा हजार कोटींचा कर माफी देण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्र शासनाने घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. सहकार चळवळ उभी करणारे विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार चळवळीचे रोपटे लावले त्याचा वटवृक्ष झालेला आज आपण पाहत आहोत, असे ते म्हणाले.
नियोजित अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्ष रवींद्र शोभणे म्हणाले, मराठी संत साहित्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी साहित्यांच्या माध्यमातून गरिबांच्या दुःखाला वाचा फोडली.
प्रारंभी, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविकातून या पुरस्काराच्या मागची भूमिका विशद केली. साहित्यिक आणि कलाकारांचा या पुरस्काराने सन्मान करण्याची मिळणारी संधी हा आमचा गौरव असल्याचे स्पष्ट केले. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आभार मानले.
या पुरस्कार्थींचा झाला सन्मान…
पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्राचार्य दिलीप धोंडगे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावाने सर्व पुरस्कार दिले जातात. यामध्ये २०२३ या वर्षासाठी साहित्यसेवा जीवनगौरव पुरस्कार – सोलापूर येथील डॉ. निशिकांत ठकार, प्रबोधन पुरस्कार – पुणे येथील अशोक चौसाळकर यांना समाज प्रबोधन पत्रिकेसाठी देण्यात आला. राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार – ‘महानुभाव वाड्मय : चिकित्सक समालोचन खंड १ व २ या ग्रंथासाठी पुणे येथील डॉ. शैलेजा बापट यांना तसेच राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार – ‘मूल्यत्रयीची कविता’ या कवितासंग्रहासाठी पुणे येथील विश्वास वसेकर यांना देण्यात आला. नाट्यसेवेबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार – जळगाव येथील शंभू पाटील यांना तर कला क्षेत्र कार्याबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार – पुणे येथील वसंत अवसरीकर यांना देण्यात आला. अहमदनगर जिल्हा साहित्य पुरस्कार – ‘श्री ज्ञानेश्वर दर्शन भाग १ व २’ या ग्रंथाच्या संपादनासाठी श्रीरामपूर येथील डॉ. शिरिष लांडगे यांना तर अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार – ‘भंडारदरा धरण शतकपूर्ती ‘ या पुस्तकासाठी भंडारदरा येथील विकास पवार तर प्रवरा परिसर साहित्य पुरस्कार – ‘ते दिवस आठवून बघ’ या कविता संग्रहासाठी कोल्हार येथील डॉ. अशोक शिंदे यांना देण्यात आला. पुरस्कार्थीं ज्येष्ठ साहित्यिक डॉ. निशिकांत ठकार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

