श्रावण महिन्याच्या निमित्ताने कामगारांसाठी कीर्तनाचे आयोजन
समाजाला दिशा दाखविणारी माध्यमे दिशाहीन
महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – मालपाणी उद्योग समूहातील कामगार आपल्या कामातच विठ्ठलाचे रूप बघणारे आहे. आयुष्यातला आनंद द्विगुणित करण्यासाठी नकारात्मक गोष्टींना दूर ठेवण्याचे आवाहन करताना आजकाल नाटक, चित्रपट, समाज माध्यमांनी विकृतीची परिसीमा गाठली. टीव्ही मालिकांनी तर कहरच केल्याचे स्पष्ट करत बहुसंख्य मालिकांमध्ये एकमेकांचे पती-पत्नी पळवापळवीचे खेळ सुपारी देऊन चालविले जात असल्याची खंत प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त महाराज आफळे यांनी व्यक्त केली.
येथील मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने श्रावण मासानिमित्त आफळे महाराजांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, व्यवस्थापक रमेश घोलप आदी उपस्थित होते.
आफळे महाराज म्हणाले, सभ्य आणि पवित्र अशी आपल्या संस्कृतीची जगात ओळख आहे. मात्र टीव्ही मालिका आणि चित्रपटातून असभ्यपणा, अश्लीलता, चारित्र्यशून्यता याचा भडीमार सुरु आहे. त्यामुळे तरुण पिढी आपल्या मार्गापासून विचलित होण्याचे प्रकार घडत आहेत. श्रावणात अनेकजण महादेवाचे पूजन करतात. त्याचा परिणाम त्यांच्या वागणुकीमध्येही दिसायला हवा.
यावेळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांपासून ते संत कबीरांपर्यंतच्या विविध संतांच्या जीवनाचे आणि त्यांनी लिहिलेल्या साहित्याचे दाखले त्यांनी दिले. आजच्या जीवनात संतसाहित्याचे महत्त्वही त्यांनी पटवून दिले. आपल्या संतांनी कोणत्याही कामाकडे लहान-मोठे म्हणून कधी बघितले नाही. त्यांना आपल्या कामातूनच साक्षात पांडूरंगाचे दर्शन घडले.
आज ज्या माध्यमांनी समाजाला दिशा दाखवावी ती माध्यमेच दिशाहीन झाल्याने भविष्यात त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील इशारा त्यांनी दिला. संतसाहित्यातून मनशांती, सुख आणि आत्मीक आनंद मिळतो आणि तो टिकाऊ असतो. त्यात रमणारी व्यक्ती आनंदाची एकेक पायरी चढत परमानंद, ब्रह्मानंद आणि आत्मानंद अशा सर्वोच्च पातळीवर जावून पोहोचते. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच संतसाहित्य शिकवले गेले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कामातच राम बघणार्या कामगार आणि कर्मचार्यांच्या समर्पण वृत्तीतून काय घडू शकते याचे मूर्तीमंत उदाहरण मालपाणी उद्योग समूहात बघायला मिळते असे प्रतिपादन संतसाहित्याचे अभ्यासक, कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले.
राजेश मालपाणी यांनी स्वागत केले. रमेश घोलप यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला मालपाणी उद्योग समूहातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

