महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – जालना जिल्ह्यात आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा संगमनेरात सकल मराठा समाज, संगमनेरकरांच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. बस स्थानकासमोर काही काळ रास्ता रोको करत आंदोलकांनी आपला संताप व्यक्त करत निषेध नोंदविला. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ रविवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली जाण्याची शक्यता असून यात सकल मराठा समाज सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली.
विश्रामगृहावर बैठक: जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी या गावांमध्ये मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असतानाच संगमनेरातदेखील सकल मराठा समाज आणि संगमनेरकर संतप्त झाल्याचे दिसून आले. शनिवारी सकाळी यासंदर्भात शासकीय विश्रामगृहावर बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलन: संतप्त कार्यकर्त्यांनी विश्रामगृहापासून बस स्थानकापर्यंत मोर्चा काढत बस स्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
निवेदन: यावेळी आंदोलकांच्यावतीने नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यात अंतरवली सराटी येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर बेसुमार लाठीमार झाला. हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला. लाठीमाराचे आदेश देणाऱ्या वर कडक कारवाई करावी. या मागणीसाठी आम्ही आग्रही आहे.
शासकीय यंत्रणेचा गैरवापर: जगभरात कौतुकास पात्र पडल्याने व शांततेत आंदोलन करणाऱ्या सदरच्या मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार हा भ्याड हल्ला आहे. अशाप्रकारे शासकीय यंत्रणा वापरून शासन मराठा आंदोलन दडपू पाहत आहे परंतु भविष्यात याचा फार मोठा उद्रेक होईल व संपूर्ण महाराष्ट्रातील देशातील मराठा समाज पेटून उठेल. व आपल्या न्याय हक्कासाठी यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल. त्यानंतर जे काही होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर असेल, असे देखील या निवेदनात म्हटले आहे.
यांची उपस्थिती: यावेळी सकल मराठा समाजाचे राजाभाऊ देशमुख, शरद थोरात, अविनाश थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, प्रशांत वामन, अविनाश सातपुते, शिवसेना (ठाकरे) शहर प्रमुख अमर कतारी, किरण घोटेकर, संजय औटी, मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, अमित गुंजाळ, सौरभ कोल्हे, अजिंक्य डोंगरे, शुभम दळवी, सुशांत पावसे, सुमित पवार, नारायण खुळे, अनिल सातपुते, निर्मला गुंजाळ आदी उपस्थित होते.


