राज्यातील शिक्षण व्यवस्थेचा दर्जा ढासळत असून शासन नवीन शिक्षक भरती करण्याऐवजी शिक्षकांना अतिरिक्त ठरवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करत असल्याचा घणाघाती आरोप ‘छात्र भारती’ विद्यार्थी संघटनेने केला आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणा विरोधात हजारो विद्यार्थी मोर्चाने रस्त्यावर उतरले होते. यात विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
बदलत्या शैक्षणिक धोरणांविरोधात छात्र भारतीने तीव्र आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन संगमनेरचे प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून देत त्वरित कार्यवाहीची मागणी केली आहे.
गेल्या १२ वर्षांपासून राज्यात योग्य प्रमाणात शिक्षक भरती न झाल्यामुळे शिक्षण व्यवस्थेची अवस्था बिकट झाली आहे. यावर मार्ग काढण्याऐवजी शासनाने कनिष्ठ महाविद्यालयांतील ४५ मिनिटांचे तासिकेचे सत्र थेट ४० मिनिटांवर आणले आहे. यामुळे रोज २० मिनिटे आणि आठवड्याला सुमारे २ तासांचे अध्यापन कमी होऊन विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. एवढेच नव्हे तर, विज्ञान शाखेच्या प्रात्यक्षिकांसाठी (प्रॅक्टिकल) पूर्वी असणारी २० विद्यार्थ्यांची तुकडी वाढवून ३५ ते ४० करण्यात येत असून एका शिक्षकावर १२० ते १८० विद्यार्थ्यांची जबाबदारी लादण्यात येत असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे गुणवत्तेचा पुरता बोजवारा उडाला आहे.
कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेच्या वैकल्पिक विषयांच्या बंद केलेल्या तुकड्या पूर्ववत सुरू कराव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्याचा अधिकार अबाधित राहील, अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयांतील तासिकेचा कालावधी पूर्ववत ४५ मिनिटे करण्यात यावा आणि प्रात्यक्षिकांसाठी विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवून गुणवत्तेची हमी द्यावी.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करता विद्यार्थी, पालक, शिक्षक संघटना व शिक्षण विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा छात्र भारतीचे राज्य अध्यक्ष अनिकेत घुले, विशाल शिंदे, राहुल जहाड, उदय पवार, हिरालाल पगडाल, ॲड. समीर लामखडे, कैफ तांबोळी आणि अभिषेक वैराळ यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.