महाराष्ट्र संवाद न्यूज
लोणी (शिर्डी) – गोदावरीच्या पाण्याच्या आवर्तन काळात अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून नियोजन करावे. तसेच निळवंडे धरणातून पाणी सोडण्याबाबत काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
लोणीत बैठक: मंत्री विखे यांच्या उपस्थितीत लोणी येथे गोदावरी आणि निळवंडे धरण आवर्तनाच्या नियोजना संदर्भात आढावा बैठक झाली.
या अधिकाऱ्यांची उपस्थिती: यावेळी नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे, अधीक्षक अभियंता आमले, नगरचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर, नाशिकचे उपविभागीय पोलिस आधिकारी गोकावे, शिर्डीचे प्रांताधिकारी माणिक आहेर, राहात्याचे तहसीलदार अमोल मोरे, वीज वितरण कंपनीचे अभियंता पाटील, कार्यकारी अभियंता बडगुजर, निळवंडे प्रकल्पाचे अभियंता हाफसे आदी उपस्थित होते.
प्रथमच ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातच पाणी देण्याची परिस्थिती उद्भवली: विखे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून धरणातील पाण्याच्या उपलब्धतेची माहिती घेत आवर्तनाच्या काळामध्ये असलेल्या आदेशाप्रमाणे भारनियमाच्या वेळापत्रकाचेही पालन करण्याचे, उपलब्ध पाण्याचा अपव्यय होणार नाही, यासाठी आधिकारी, कर्मचाऱ्यांसह स्थानिक कार्यकर्त्यांनी दक्षता घेण्यास सांगितले. अत्यल्प पावसामुळे यंदा प्रथमच ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातच धरणांमधून सिंचन आणि पिण्यासाठी पाणी देण्याची परिस्थिती उद्भवली असल्याने उपलब्ध पाण्याचे सुयोग्य पद्धतीने नियोजन करावे लागणार असल्याचे ते म्हणाले.
चाऱ्यांमधील अडथळे दूर करण्यासाठी मनुष्यबळ व यंत्रसामुग्री उपलब्ध करून देणार: शेती पिकांना पाणी मिळणे गरजेचे असल्याने शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाचे नियोजन आवश्यक आहे. चाऱ्यांमधील अडथळे दूर करावे यासाठी आवश्यक तेथे जेसीबीसह अन्य साहित्य व मनुष्यबळाची उपलब्धता डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अकोल्यातील कालव्यांसाठी दहा दिवसांची डेडलाईन: निळवंडे धरणातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाचा आढावा घेत कालव्यातून तातडीने पाणी देण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या व अकोले तालुक्यात असलेल्या कालव्यातील कामांच्या त्रुटी दहा दिवसात दुरुस्त करून पाणी देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पोलिसांची मदत घ्या: वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखील भार नियमनासंबंधीचे नियोजन चांगल्या पद्धतीने हाताळावे. शेतकऱ्यांना अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी तसेच बेकायदेशीरपणे पाणी उपसले जाणार नाही, याकरिता पोलीस प्रशासनाची मदत घेण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.

