महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर – गेल्या वर्षीच्या तुलनेत अहमदनगर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने हीच परिस्थिती कायम राहिल्यास जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे संभाव्य दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे. जिल्ह्यात मागील त्याला काम उपलब्ध होण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे अधिक प्रमाणात सेल्फवर मंजूर करून ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
बैठक: संभाव्य परिस्थिती संदर्भात करावयाच्या योजनांबाबत उपाय योजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित यंत्रणांच्या बैठकीवेळी सालीमठ बोलत होते. अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी आणि संबंधित विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, चालू वर्षात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याचे पाणी जनावरांसाठी चारा तसेच मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी यंत्रणांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी ग्रामस्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या-कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन उपाययोजनांबाबत सूचना द्याव्यात. टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी मागणीप्रमाणे नियोजन करण्यात यावे. पाण्याचे स्त्रोत उपलब्ध असलेल्या जागांची माहिती अद्यावत करावी.
सूचना: मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी रोजगार हमी योजनेची प्रत्येक गावात सार्वजनिक स्वरूपाची किमान पाच कामे मंजूर करून ठेवत यंत्रणांनी रोजगार हमी योजनेची अधिकाधिक कामे सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
दक्षता घ्या: याशिवाय अहमदनगर जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा होत असून गणेशोत्सवासह सर्व सण शांततेत साजरे होतील, या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याच्या दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी तळपदे यांनी दिली ही माहिती…
जिल्ह्यातील यंत्रणा आणि ग्रामपंचायत विभागाकडील एकूण 23 हजार 357 कामे शेल्फवर असून यामध्ये वैयक्तिक लाभाच्या तसेच सार्वजनिक स्वरूपाच्या कामांचा समावेश आहे. या माध्यमातून 62 लक्ष 22 हजार 218 मनुष्य दिन निर्माण होणार आहेत. सद्यस्थितीत आज जिल्ह्यामध्ये 1444 कामे सुरू असून त्यावर 7420 मजूर कार्यरत आहेत. तसेच 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये 3 लाख 41 हजार 503 कामे आराखड्यात असून या माध्यमातून 13 कोटी 27 लक्ष मनुष्य दिवसाचा रोजगार उपलब्ध होऊ शकेल.

