
महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – संगमनेरचे महसूल प्रशासनासह सरकारी यंत्रणा मंत्र्यांचे दौरे आणि त्यांच्या मागे पुढे करण्यात व्यस्त आहे. आमदारांनी बोलाविलेल्या टंचाई आढावा बैठकीला प्रांताधिकारी तहसीलदार गैरहजर राहतात. येथील प्रशासन आणि सरकारला गोरगरीब जनतेचे दुःख कळत नाही. अनेक लाभार्थी शासकीय लाभांपासून वंचित ठेवले जात असून संगमनेर तालुक्यात पालकमंत्र्यांच्या खबऱ्यांच्या सूचनेवरून कामे होत आहेत. हेच चित्र जर असे सुरू राहिले तर तहसील कार्यालयावर महसूल प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा सरपंच भाऊराव रहाणे यांनी दिला आहे.
तक्रारी: आमदार बाळासाहेब थोरात यांनी यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये सोमवारी टंचाई आढावा बैठक बोलाविली होती. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या कामाचे वाभाडे काढतानाच महसूल प्रशासनाच्या कामकाजाविषयी तीव्र नाराजी नोंदविली. मोठमोठ्या जाहिराती करून राज्य सरकारकडून घोषणा होत आहे. मात्र या घोषणांची कोणतीही अंमलबजावणी केली जात नाही. दुष्काळाचे मोठे संकट असताना जनावरांसाठी चारा, पिण्याचे पाणी, थकलेले अनुदान, प्रशासनाचा मनमानी कारभार, वीज बिलांवर व्याज आकारणी अशा विविध प्रश्नांसंदर्भात नागरिक व पदाधिकाऱ्यांनी थोरात यांच्याकडे सरकारविरुद्ध तक्रारी केल्या.
अनुदान नाही: तालुक्यात दुष्काळाचे संकट मोठे आहे मात्र मंत्री व राज्य सरकारला याबाबत काही देणे घेणे नाही. तालुक्यात पशुधन मोठे असून याकरता सरकारने चाऱ्याची व्यवस्था केली पाहिजे. पाणीपुरवठा योजना तसेच घरगुती वीज बिलांवर सावकारी पद्धतीने 18 टक्के व्याज आकारणी केली जाते. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान मिळाले नाही. कांदा अनुदानाचे शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाही. यावर्षी खरिपाची पिके पूर्णतः वाया गेले आहे. सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.
खबऱ्यांच्या सूचनेवर काम: साधी शिधापत्रिका देण्यापासूनची जनतेचे छोटी-छोटी कामे अडविले जात आहे प्रशासन ठप्प आहे. संगमनेर तालुक्यात फक्त पालकमंत्र्यांच्या खबऱ्यांच्या सूचनेवर काम होत असून अनेक लोक शासकीय लाभापासून वंचित ठेवले जात आहे.
तर मोर्चा काढणार: आमदार थोरात यांनी केलेल्या पाठपुराव्यातून मिळविलेल्या मोठ्या निधीमधून मंजूर झालेल्या विकास कामांना स्थगिती दिली जात आहे. जेथे-जेथे काम सुरू आहे, तेथे जाऊन खबरे अडवणूक करत आहे. विविध ठिकाणी कामे खोळंबले असून गोरगरिबांच्या घरकुलाला वाळू मिळत नाही. मात्र खबऱ्यांच्या सूचनेवरून रात्रंदिवस मुरूम व वाळू उपसा जोरात सुरू आहे. यावर स्थानिक प्रशासन गप्प असून असेच जर सुरू राहिले तर तहसील कार्यांवर मोठा मोर्चा काढावा लागेल, असा इशारा सरपंच भाऊराव राहणे यांनी दिला. बी. आर. चकोर, जनार्दन कासार, बाबासाहेब कांदळकर, सचिन दिघे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात तक्रारी केल्या.

