महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – बहुजन उद्धारक रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील ३७० गड किल्ल्यांपैकी २९६ गड किल्यांवर केरळ येथील शिवप्रेमी पर्यटकाने सायकल परिक्रमा केल्याने महाराष्ट्रातील गिर्यारोहक आणि पर्यटन प्रेमीमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
केरळ येथील एस. के. हमराज तथा शिवराज गायकवाड हे १ मे २०२२ रोजी केरळ येथुन सायकलवर महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाले. उद्देश एकच फक्त शिव विचारांची प्रेरणा त्यांनी आतापर्यंत २९६ गड किल्ले सर केले आहेत. घनदाट जंगल-झाडी, कडे-कपारीतून वाट काढत ते किल्ल्यांवर पोहोचतात छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आणि दातृत्व फार मोठे असल्याचा अनुभव यावेळी त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात प्रवासात अनेक जण आस्थेवाईकपणे त्यांची चौकशी करत आहेत. नुकतेच त्यांचे शिवनेरी येथे आगमन झाले असता संगमनेर येथील शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल ढेंबरे, शिवसेनेचे जुन्नर तालुकाध्यक्ष अण्णा काकडे, गिरीष कोकणे, उद्योजक मंगेश कुऱ्हाडे, ऋषिकेश शेळके, बाबु कोकणे, पिंटूशेठ तसेच आळे ग्रामस्थांनी स्वागत केले.

