महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – सत्ताधारी काँग्रेस पक्षाने संगमनेर नगर परिषदेत गेल्या ३० वर्षात केले नाही ते आता आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये करून दाखविणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी म्हटले आहे.
जहागीरदार यांनी म्हटले आहे की, गेल्या ३० वर्षांपासून संगमनेर नगर परिषदेमध्ये आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आहे. संगमनेर नगरपलिकेत दर चार वर्षानी मालमत्तेचे (घरपट्टी) रिव्हिजन होते. रिव्हिजनचा अर्थ असा होतो की, नगरपलिका हद्दीतील जी मालमत्ता आहे त्यात काही बदल झाल्यास, नवीन इमारती, जुन्या इमारतीच्या जागेवर नवीन इमारत, जागेत बदल झाल्यास त्याचे फेर मूल्यांकन केले जाते.
परंतु संगमनेर नगरपलिकेत एकहाती सत्ता असलेले सत्ताधारी सर्व कायदे धाब्यावर बसवून दर चार वर्षाने रिव्हिजन होत असताना देखील घरपट्टी कायदे आपल्या सोयीनुसार राबवत असतात. सत्ताधाऱ्यांनी घरपट्टीचे दर १०% वाढवले. या संदर्भात कायदा सांगतो की, कलम ११२ नुसार घरपट्टी वाढवण्याचे किंवा कमी करण्याचे अधिकार जनरल कौन्सिलला आहे. परंतु येथे दर चार वर्षानी घरपट्टीची रिव्हिजन करतांना वाढ केली जाते यामध्ये कायद्याचा कोठेही संबंध येत नाही.
सातत्याने ३० वर्षात शहरातील घरपट्टीत वाढ करण्यात आली आहे. दुर्गाताई तांबे नगराध्यक्ष असतांनादेखील २५/०६/२०१८ रोजी घरपट्टीत १०% वाढ करण्यात आली. महाराष्ट्रात सर्वात जास्त घरपट्टी घेणारी संगमनेर नगरपालिका आहे. या संदर्भातील बैठकांमध्ये कोणत्याही नगरसेवकाने आत्तापर्यंत विरोध केला नाही, याबाबतचे सर्व ठराव आपणाकडे उपलब्ध आहेत.
मात्र नुकत्याच वाढविलेल्या घरपट्टी विरोधात भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना १६/१०/२०२३ रोजी निवेदन देण्यात आल्यानंतर लगेच कांग्रेस वाल्यांनी दुसऱ्या दिवशी १७/१०/२०२३ ला नगरपालिकेत निवेदन देत घरपट्टी वाढीला विरोध केला.
घरपट्टी वाढीविरोधात निवेदन देणाऱ्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो की, संगमनेर नगर परिषदेमध्ये तब्बल तीस वर्ष सत्ता असताना या काळात एकाही नगरसेवकाने एकदाही घरपट्टीला विरोध केला नाही मग आता यांना विरोध करण्याचा अधिकार आहे का? घरपट्टी वाढीविरोधात आपण २०१८ ला न्यायालयात, औरंगाबाद हायकोर्टात गेलो असताना सत्ताधारी काँग्रेस पक्षाने माझे वकील फोडले. आणि आज हेच लोक घरपट्टी कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची कॉपी करत आहेत.
जोपर्यंत यांच्याकडे सत्ता असेल तोपर्यंत यांची मनमानी चालत राहणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावरील खोटा बुरखा फाडण्यासाठी संगमनेर नगर परिषदेमध्ये परिवर्तनाची आवश्यकता असून संगमनेरकरांनी परिवर्तन करावे, संगमनेर नगर परिषदेमध्ये सत्ताधारी काँग्रेसने ३० वर्षात जे केले नाही ते आम्ही राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्षात करून दाखवू, असे भाजपा शहर सरचिटणीस, माजी उपनगराध्यक्ष जहागीरदार यांनी म्हटले आहे.



