विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप
भाजपा आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही संशय व्यक्त केला.

हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडताना म्हटले की, विधान परिषद निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांचे मर्यादित मतदार असतात. मात्र, या मर्यादित मतदारांच्या निवडणुकीतही सत्ताधारी महायुतीकडून ‘पैसा फेक तमाशा देख’ असा उघड खेळ सुरू आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घ्यावेत यासाठी सत्ता, पैसा आणि प्रशासकीय यंत्रणेचा प्रचंड गैरवापर केला जात आहे.
निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असून त्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडणे अपेक्षित असते. परंतु, भाजपाची सत्तेची राक्षसी हाव आणि मदमस्तपणा कमालीचा वाढला असून त्याचाच प्रत्यय या निवडणुकीत येत आहे. भाजपाने लोकशाही मूल्यांची थट्टा उडवत निवडणुकीत मोठा घोडेबाजार मांडला असून, हे लोकशाहीसाठी एक ‘काळे पर्व’ आहे. या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी आता सर्वांना एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील, असे आवाहनही त्यांनी केले.
