विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप
मला अजिबात धक्का बसला नाही. मला हे अपेक्षित होते.

राऊत म्हणाले, मला जी काही माहिती आहे, त्यानुसार पुणे, यवतमाळ या ठिकाणी उमेदवारी मागे घेण्यात आली आहे. मी आधीपासून सांगत होतो की आपल्याकडे संख्याबळ नाही. तरीही काही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या आदेशाने निवडणुका बिनविरोध होऊ नये, यासाठी उमेदवारी अर्ज भरले. ते शेवटपर्यंत टीकायला हवे होते. मात्र, निवडणुका बिनविरोधच करायच्या या सरकार पक्षाच्या अट्टहासापायी अनेक मार्गांचा अवलंब झाला आणि त्यात मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाच्या उमेदवारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला आणि तो काही ठिकाणी यशस्वी झाला, असं राऊत यांनी म्हटलं.
संभाजीनगरमध्ये आमच्या उमेदवाराने माघार घेतली. तिथेही साधारण त्याच पद्धतीने व्यवहार झाले, असा गंभीर आरोपच राऊतांनी केल्याने खळबळ उडाली आहे. तर शिवसेनेने बाळ माने यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे आणि संभाजीनगरमधून देवयानी डोणगावकर आणि कृष्णा डोणगावकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती देत राऊतांनी म्हटले की, हे चालणार नाही. हे विष, ही कीड चालणार नाही. ठीक आहे की आज आम्ही कुठे तरी कमी आहोत. तरीही पक्षप्रमुखांची, पक्षाची परवानगी न घेता तुम्ही माघार कशी घेऊ शकता? काय व्यवहार झाले? ही सर्व माहिती ज्याने व्यवहार केले, त्यानेच आम्हाला कळवली. ही माणसे विकत घेण्याची प्रक्रिया या राज्यात सुरू आहे. मला असं वाटतं की हे राज्य आणि देश नासवण्याचा हा प्रकार आहे. हे फार घातक आहे, असा हल्लाबोलही यावेळी राऊतांनी केला आहे.
ही लोकशाही नाही, हे माझे प्रामाणिक मत होते आणि मी ते प्रामाणिक मत अनेकदा माझ्या पक्षात मांडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये महाविकास आघाडीची बेअब्रु होईल, खासकरून माझ्या पक्षाची बेअब्रू होईल, याची सारखी भीती वाटत होती, असे यावेळी खासदार संजय राऊतांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.