महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई : या राज्याचा एक उपमुख्यमंत्री काडीखोर आहे, असं विधान मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्यानंतर एक फूल आणि दोन हाफ हेच काडीखोर आहेत. यांनीच महाराष्ट्र पेटवला आहे. यांनाच महाराष्ट्र पेटलेला हवाय. यांनीच राज्यातील सर्व प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी हा प्रश्न चिघळत ठेवलेला आहे, असं टीकास्त्र शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री, आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर सोडले आहे.
राऊत म्हणाले, मरठा आरक्षणाचा मुद्दा या सत्ताधाऱ्यांनीच चिघळत ठेवला आहे. कारण, त्यांना इतर मुद्यांवरून लक्ष भरकटवायचं आहे. त्यामुळे जरांगे पाटील म्हणाले की, एक उपमुख्यमंत्री काडीखोर आहे तर तसं नाही, एक फुल आणि दोन हाफ हे सगळेच काडीखोर आहेत.
मराठा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला अनेक पक्षांना आमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वगळण्यात आले आहे. ठाकरे गटाकडून केवळ विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निमंत्रित करण्यात आले. यावर राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मुख्यमंत्रीच घटनाबाह्य असल्याने त्यांना ही बैठक बोलवण्याचा अधिकारच नाही. तसंही मुख्यमंत्री 31 डिसेंबरनंतर जाणार आहेत.
6 खासदार आणि 16 आमदार असणाऱ्या पक्षाला निमंत्रित करायचं नाही आणि ज्यांचा एकही आमदार नाही, अशा अन्य पक्षांनाही बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे यातून मुख्यमंत्र्यांची संकुचित मनोवृत्ती आणि डरपोकपणा दिसतो, व्यक्तीगत सूड, द्वेष आणि पोटदुखीतून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला गेल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र जळत आहे तो विझवा आणि जरांगे पाटलांचे प्राण वाचवा. आम्हाला बैठकीला बोलवलं नाही त्यावर आमचं काहीही म्हणणं नाही परंतु या बैठकीतून यावर तोडगा काढायला हवा, असं राऊतांनी म्हटलं आहे.
… मग सरकार झोपलयं का? सरकारमध्येच समाजविघातक प्रवृत्तीची लोक
मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं होतं की, मराठा आरक्षणात काही समाज विघातक प्रवृत्ती शिरल्या आहेत. त्यावर राऊत म्हणाले, असं असेल तर मग सरकार झोपलं आहे का? खरं तर सरकारमध्येच समाजविघातक प्रवृत्तीची लोक आहेत. त्यांनीच या महाराष्ट्राला पेटवलं आहे. भ्रष्ट आणि माफिया प्रवृत्तीची लोक या सरकारमध्ये आहेत, असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.



