महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळ पडला आहे. मात्र तालुके दुष्काळी जाहीर झाल्याने अशा गावांना त्याचा लाभ मिळणार नाही. अनेक गावे योजनांपासून वंचित राहतील. दुष्काळी भागातील शेतकरी वंचित राहू नये, यासाठी दुष्काळाचे मूल्यमापन करताना तालुक्याऐवजी गाव हा निकष करावा, अशी मागणी नाशिक पदवीधर संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे.

डॉ. तांबे म्हणाले, नगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र येथे दुष्काळ जाहीर झाला नाही. खरिपाची पिके वाया गेली. रब्बीच्या पेरण्यांमध्ये अडचणी आहे. नैसर्गिक आपत्ती, बदलते वातावरण या सगळ्या बाबींमुळे शेतकरी सातत्याने संकटात सापडत आहे. समाजातील महत्त्वाचा घटक असलेल्या शेतकऱ्यांना संकट काळात राज्यकर्त्यांनी आधार देण्याची आवश्यकता असते.

संपूर्ण पावसाळा संपला मात्र राज्यभरात पुरेसा पाऊस यावर्षी झाला नाही. परिणामी पेरण्या वाया गेल्या. आत्ताच्या घडीचा विचार केला तर अनेक गावात रब्बीच्या पेरण्या झाल्या नाहीत. गावागावांत पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे आहे. पिण्याचे पाणी नसल्याने दुग्ध व्यवसाय, पशुपालन या सगळ्या बाबी अडचणीत आल्या आहेत.

या सगळ्या गोष्टीचा विचार करता शासनाकडून शेतकऱ्यांना दुष्काळी योजनांचा लाभ मिळणे गरजेचे असते. शासनाने नुकतेच दुष्काळग्रस्त तालुके जाहीर केले आहेत, मात्र अनेक गावांमध्ये दुष्काळ असूनही तालुका हा निकष असल्याने दुष्काळग्रस्त जाहीर न झालेल्या तालुक्यातील अनेक दुष्काळी गावांना त्याचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुळात एका तालुक्यामध्ये काही भागात चांगली स्थिती असते, तर काही भागात दुष्काळ असतो. त्यामुळे तालुका हा निकष दुष्काळ जाहीर करण्याला योग्य नाही.

दुष्काळाचा लाभ द्यायचा असेल तर थेट गाव पातळीवरचे निकष महत्त्वाचे आहेत. गाव पातळीवर दुष्काळी निकष ठेवला तर कोणताही शेतकरी किंवा कोणतेही गाव दुष्काळी योजनांपासून वंचित राहणार नाही. त्यामुळे प्रामुख्याने दुष्काळी निकष बदलून ते तालुक्याऐवजी गाव करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

