महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि मधल्या फळीतील शैलीदार फलंदाज अजिंक्य राहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. निवृत्तीची घोषणा करताना अजिंक्य अत्यंत भावुक झाला होता. देशासाठी खेळताना नेहमीच सच्चेपणाने योगदान दिल्याचे सांगत, भारतीय क्रिकेटच्या या गौरवशाली पर्वाचा भाग होता आल्याबद्दल त्याने मनापासून समाधान व्यक्त केले. खेळणे थांबवले तरी खेळाप्रति योगदान देण्याचा ध्यास कायम राहील, असा विश्वासही त्याने यावेळी दिला.
डोंबिवली ते मुंबई असा लोकल ट्रेनने खडतर प्रवास करत क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या अजिंक्यने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईसाठी दमदार कामगिरी करत राष्ट्रीय संघात स्थान मिळवले होते. सुरुवातीच्या काळात दिग्गजांच्या उपस्थितीमुळे प्रदीर्घ वेळ राखीव बाकावर बसावे लागले, तरीही मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले.
भारतासाठी ८५ कसोटी, ९० एकदिवसीय आणि २० टी-२० सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व करताना तो मधल्या फळीतील सर्वात विश्वासू फलंदाज म्हणून उदयास आला. विराट कोहलीचा विश्वासू साथीदार असलेल्या अजिंक्यच्याच शांत आणि संयमी नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर चषक जिंकण्याचा पराक्रम केला होता.
आपल्या कारकिर्दीचा प्रवास आठवताना अजिंक्य म्हणाला की, डोंबिवलीतून लोकलने प्रवास करणाऱ्या एका मुलाचे देशासाठी खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले, हा अतिशय अभिमानास्पद प्रवास होता. फलंदाजी करताना नेहमी टायमिंगला महत्त्व दिले असले, तरी निवृत्तीचा हा निर्णय घेणे अत्यंत कठीण होते.
मुंबई क्रिकेटने मला घडवले असून आई-वडिल, पत्नी, मुले आणि पाठीशी उभे राहिलेल्या चाहत्यांच्या प्रेमामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. बीसीसीआय, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि सहकाऱ्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच ही वाटचाल शक्य झाल्याचे सांगताना त्याच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते.