महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाचे स्मारक उभारण्याकरीता पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी निधीची उपलब्धता करून दिल्याने अनेक वर्षाची संगमनेरकर नागरीकांची इच्छा पूर्ण होणार असून स्मारकाच्या उभारणीबाबत पालकमंत्र्यासोबत लवकरच बैठक आयोजित करून जागेबाबतचा निर्णय केला जाणार असल्याची माहीती अमोल खताळ पाटील यांनी दिली.
संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी शिवप्रेमींची इच्छा होती. यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. या मागणीची पूर्तता करण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्णाकृती स्मारक उभारण्याकरीता निधीची उपलब्धता करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने लोणी संगमनेर आणि श्रीरामपूर येथे स्मारक उभारण्यास प्राधान्य देण्यात आल्याबद्दल खताळ यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
संगमनेर शहरात स्मारक उभारणीबाबत लवकरच मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली जाणार असून यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या सदस्याकडून स्मारकाच्या जागेसह इतर येणाऱ्या सूचनांनूसार कार्यवाही केली जाणार आहे.
महाराजांच्या पुतळ्यासाठी निधी मंजूर झाल्यानंतर काही लोकप्रतिनिधी आम्हीच निधी मिळवून दिला असे सांगून यामध्ये राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. त्यांनी मोठ्या मनाने नामदार विखे यांचे आभार मानायला पाहिजे होते. ४० वर्ष ज्यांना याबाबत काही सुचले नाही त्यांनी आता निधी मंजूर झाल्यावर बोलणे म्हणजे हास्यास्पद असल्याचे खताळ यांनी म्हटले आहे.


