महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा करण्यात पोलीस यशस्वी झाले आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे समोर आले असून पोलिसांनी मृताच्या जावयासह आणखी एकाला अटक केली असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.
घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत साकुर जवळील घाटामध्ये १६ डिसेंबरला फॉरेस्ट जमिनीत बांधावर एका पुरुषाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत आढळून आले होते. त्यावेळी ही व्यक्ती कोण आहे याचा खुलासा झाला नव्हता. हा घातपाताचा प्रकार असल्याचे लक्षात घेत पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला होता. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यापासून खून करणाऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेरीस या खून प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

गोरख दशरथ बर्डे ( वय ४८, रा. मिरपुर, लोहारे, तालुका संगमनेर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून दिनेश शिवाजी पवार (रा. वडगाव कांदळी ता. जुन्नर) आणि विलास पवार (रा. पेमदरा, ता. जुन्नर जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. यातील दिनेश पवार हा मृताचा जावई असून विलास पवार हा शेजारी राहणारा आहे. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
आरोपींच्या पत्नीशी मयताचे अनैतिक संबंध असल्याचा संशय त्यांना होता. त्यावरून त्यांनी त्याला माळवाडी येथे एका नातेवाईकाच्या लग्नात वरातीला बोलवून त्याचा खून केला व ओळख पटू नये म्हणून ज्वलनशील पदार्थ टाकून त्याचा चेहरा आणि शरीराचा काही भाग जाळण्यात आला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
जांभूळवाडी शिवारात वनविभागाच्या जागेत या व्यक्तीचा मतभेद आढळून आल्यानंतर रणखांब गावचे पोलीस पाटील साहेबराव बाबुराव बारवे यांनी यासंदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात माहिती देऊन त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये अज्ञात व्यक्ती मयत झाल्याची नोंद करण्यात आली होती.

