अपघातात गंभीर जखमी झालेल्या निमगाव टेंभी येथील एका १८ वर्षीय तरुणाचा ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वैभव विलास कदम (वय १८, रा. देवगड वस्ती, निमगाव टेंभी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. एका अपघातात वैभव गंभीर जखमी झाला होता, यामुळे त्याला उपचारकामी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ५ जून २०२६ रोजी दुपारी १४:१५ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या मेमोच्या आधारे संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यू रजि. नं. ६९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी घटनेची दखल घेतली असून, त्यांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल जे. के. खेमनर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.