पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दाभिळ गावाजवळ एक भीषण दुर्घटना घडली आहे. पर्यटकांची स्कॉर्पिओ गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुमारे ७०० ते ८०० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी अपघातात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील आठ तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतांमध्ये महेश अनिल पवार, आदित्य अशोक साळुंखे, रितेश राजेंद्र लोखंडे, सुहास जितेंद्र लोखंडे, अंश समीर चव्हाण, उत्कर्ष आनंद शिंगटे, अनिल अभिमन्यू शिंगटे आणि नितीन किसन नायकोंडे यांचा समावेश आहे.
हे सर्व तरुण (वय १८ ते ३५ वर्षे) शुक्रवारी कोकणात सहलीसाठी आले होते. दापोलीतील हर्णे येथून रविवारी परतत असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, तहसीलदार कपिल घोरपडे यांच्यासह सह्याद्री ट्रॅकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर व पोलादपूरचे स्थानिक ट्रेकर्स आणि महाडच्या सिस्केप संस्थेचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रात्रीचा अंधार आणि दुर्गम भागाचे आव्हान असूनही बचाव पथकांनी दरीत उतरून शोधमोहीम राबवली. सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, दोरी आणि स्ट्रेचरच्या साहाय्याने मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.