महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन घारगाव (संगमनेर):
कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील गुळंजवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात बोटा येथील पाच भाविक गंभीर जखमी झाले.
पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील बोटा (ता. संगमनेर) या आपल्या गावाकडे कारने परतत असलेल्या भाविकांच्या कारला (कार क्रमांक एम एच १४ एन डी ३३७८) समोरून येणाऱ्या दुसऱ्या पिकअप वाहनाने (एम एच २४ बी डब्लू २८६२) जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या दुर्घटनेत कारमधील जिजाभाऊ दत्तात्रय शेळके, चालक शिवाजी शांताराम मेंगाळ, बाळासाहेब भागाजी मुसळे, सुभाष तुकाराम शेळके आणि आनंदा रामभाऊ मधे (सर्व रा. बोटा, ता. संगमनेर) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक गुळंजवाडी ग्रामस्थ आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या समयसूचकतेमुळे वाहनात अडकलेल्या जखमींना तात्काळ बाहेर काढून आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला सारत वाहतूक पूर्ववत केली.